पालघर नगर परिषदेमध्ये कचरा विलगीकरणाचा सव्वा दोन कोटीचा घोटाळा

पालघर नगर परिषदेमध्ये कचरा विलगीकरणाचा सव्वा दोन कोटीचा घोटाळा
Published on

घनकचऱ्यात कोट्यवधींचा घोटाळा
पालघर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचा आरोप

पालघर, ता. २८ (बातमीदार) : पालघर नगर परिषदेत कचरा विलगीकरणासंदर्भात तब्बल सव्वादोन कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप नगर परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत भाजपचे गटनेते व नगरसेवक भावानंद संख्ये यांनी केला आहे. या आरोपानंतर संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी सभेत जाहीर केली.
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. २५) पार पडली. विविध विकासकामांच्या मंजुरीसाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र या वेळी विविध विषयांवर चर्चा होत असताना अचानक भाजपचे गटनेते भावानंद संख्ये यांनी नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील घनकचऱ्याबाबत मोठा प्रश्न निर्माण केला. सर्व्हे क्रमांक १३१ वरील जो घनकरचा प्रकल्प राबवला जात आहे त्याच्या विलगीकरणासाठी नगर परिषदेने वारांगडे, बोईसर येथील एका संस्थेला कार्य दिले आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येक महिन्याला १२ लाखांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार दरमहिन्याला ४० लाख टन कचऱ्याचे विलगीकरण करणे, त्यातून कंपोस्ट खत निर्माण करणे तसेच कचऱ्यातून भंगार वस्तू व इतर वस्तू वर्गीकृत करण्याच्या कामाचा समावेश आहे. या कार्याकरिता त्यांना १५ कर्मचारी सहभागी करण्याची परवानगी असून, त्यात दोन ऑपरेटर, डाटा ऑपरेटर, पर्यावेक्षक व जेसीपी चालक यांचा समावेश आहे. यासंदर्भात पुरावे तपासले असता, याबाबत कोणतेच कार्य झाले नसल्याचे कागदपत्रांतून समोर आल्याची माहिती संख्ये यांनी समोर आणली आहे.
संख्ये यांच्या मते, कोणतेही १५ कर्मचारी या प्रकल्पावर काम करताना दिसत नाहीत. या प्रकल्पात एकच व्यक्ती काम करीत असल्याचे दिसून येते. त्या संबंधातील छायाचित्रेही आपल्याकडे आहेत. असे असले तरी कंत्राटाचे बिल मात्र वेळोवेळी घेण्यात आले आहे. सर्व परिस्थितीचा विचार करता प्रकल्पात फक्त चारच माणसे काम करीत आहेत. बैठकीत संख्ये म्हणाले, की कंत्राटदाराने कचऱ्याचे विलगीकरण करणारी मशीनही वापरली नाही. तसे असले तरी त्या मशीनचे बिल दरमहा एक लाख ४३ हजारप्रमाणे नगर परिषदेने त्यांना दिले आहे. १३ महिने येथील काम बंद असताना त्या महिन्यांचे बिल कोणत्या कायद्याप्रमाणे अदा करण्यात आले, असा प्रश्नही संख्ये यांनी या वेळी उपस्थित केला.
-------------
चार महिन्यांत एकाच रकमेची बिले
या बैठकीत भावानंद संख्ये यांनी आणखीन काही मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, की १७ ऑक्टोबर २०२५ ते १० फेब्रुवारी २०२६ या काळात चार महिन्यांची एकाच रकमेची बिले दरमहा ११ लाख ४९ हजार २३४ रुपयांची काढलेली आहेत. या चार महिन्यांत १५ मजूर कधीच रजेवर नव्हते का, जेसीबी कायम चालू होता का याची पाहणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याने जागेवर जाऊन करणे गरजेचे होते. याचाच अर्थ काम झाले नसतानाही त्या कामाचे पैसे कंत्राटदाराला मिळाले असून, याची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे गटनेते भावानंद संख्ये यांनी केली आहे.
-------------
नगराध्यक्षांचे चौकशीचे आदेश
दरम्यान, याबाबत नगराध्यक्ष उत्तम घरत यांनी चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी नगराध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना १० दिवसांची वेळ दिली आहे. दुसरीकडे याबाबत योग्य चौकशी न झाल्यास हे प्रकरण जिल्हाधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यात यावे, अशी मागणी बैठकीत सर्वच नगरसेवकांनी केली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com