

ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले
मोठी आवक झाल्याचा परिणाम
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : उन्हाचा कडाका वाढत असून शरीराला थंडावा देणाऱ्या रसाळ फळांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यानुसार फळांच्या दरात ही वाढ होते. मात्र, यंदा फळांची आवक वाढल्याने बाजारात दर घसरलेले पाहायला मिळत आहेत. पुढच्या महिनाभर तरी हे दर असेच राहणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
उन्हाळ्यामुळे कलिंगड, टरबूज, पपई आणि द्राक्षे या फळांना सर्वाधिक पसंती दिली जाते. वाशीच्या घाऊक बाजारात दररोज कलिंगडाच्या ४० ते ४५ गाड्यांची आवक होत आहे. आवक जास्त असल्याने किमती निम्म्यावर आल्या आहेत. घाऊक बाजारातील किंमतीवरील परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी १०० ते १२० रुपयांना मिळणारे कलिंगड आता अवघ्या ५० रुपयांत उपलब्ध होत आहे. द्राक्षांचे दरही किरकोळ बाजारात १५० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत, जे पूर्वी २५० रुपयांच्या घरात होते. दरातील या घसरणीमुळे फळप्रेमींना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या खिशावरील ताण काहीसा कमी झाला आहे. बाजारात आवक कायम राहिल्यास पुढील महिनाभर तरी फळांचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
घाऊक बाजारातील दरात फरक (प्रति किलो):
फळ आधीचे दर घाऊक सध्याचे दर घाऊक
कलिंगड २५ ते ३० रुपये १० ते १५ रुपये
टरबूज ३० ते ३५ रुपये १८ ते २५ रुपये
पपई २० ते ३० रुपये १५ ते २० रुपये
द्राक्षे २०० ते २५० रुपये १०० रुपये (सरासरी)