अभय योजनेने भरली पालिकेची तिजोरी

अभय योजनेने भरली पालिकेची तिजोरी
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करावरील दंडात ९० टक्के सूट देणाऱ्या अभय योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. २५ मार्चला एका दिवसात तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली. या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर योजनेची मुदत आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ठाणे पालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी १२ मार्चपासून निवासी मालमत्ता करदात्यांसाठी ही योजना जाहीर केली होती. सुरुवातीला २५ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. दंडावरील ९० टक्के सूट मिळवण्यासाठी नागरिकांनी शेवटच्या दिवशी महापालिका मुख्यालयासह सर्व प्रभाग आणि उपप्रभाग कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी कर भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. १२ ते २५ मार्च या कालावधीत एकूण ५७ कोटी रुपयांची वसुली झाली. त्यापैकी शेवटच्या दिवशीच १३.५० कोटी रुपये जमा झाल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी महापालिकेने मालमत्ता करातून ८१९.७१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. २५ मार्चपर्यंत ७६० कोटी रुपयांची वसुली पूर्ण झाली आहे. दरम्यान, विशेष अर्थसंकल्पी महासभेत सभागृहनेते हणमंत जगदाळे यांनी योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला होता, तर विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर महापौरांनी प्रशासनाला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले.

तिजोरीत भर पडणार
माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी वाणिज्य (कमर्शियल) करदात्यांनाही दंडात सवलत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या व्यावसायिक करदात्यांनाही ९० टक्के दंडमाफी लागू करण्यात आली आहे. मुदतवाढीमुळे येत्या काही दिवसांत आणखी ३० ते ४० कोटी रुपयांची भर पडण्याची अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिक वर्षअखेरचे उद्दिष्ट गाठण्यास प्रशासनाला मदत होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com