

ठाणे शहर, ता. २८ (बातमीदार) : मुंबईत हरवलेल्या बिहारमधील एका तरुणाला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रशासनाने मोठ्या प्रयत्नांतून त्याच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. पोलिसांना तो मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात आढळला होता. पोलिसांनी त्याला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. चार महिन्यांपासून हा तरुण रुग्णालयात मानसिक आरोग्य उपचार घेत होता. उपचारादरम्यान त्याची मानसिक स्थिती सुधारत असताना त्याच्याकडून कुटुंबाबाबतची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू होता.
चार महिन्यांपूर्वी मानसिक अवस्था बिघडलेल्या अवस्थेत सापडलेल्या तरुणावर उपचार करता करता त्याच्याकडून बिहारात राहत असलेल्या कुटुंबाचा पत्ता शोधून काढला. मात्र त्याचे कुटुंब तेथूनही दिल्लीला राहायला गेले होते. त्यानंतरही हार न मानता प्रशासनाने दिल्लीतील पत्ताही शोधून काढला. १३ जानेवारीला व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीयांची ओळख पटवून घेतली. काही दिवस उपचार करून तरुणाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला नुकतेच कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत उपअधीक्षिका डॉ. प्राची चिवटे, वरिष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशीष पाठक, डॉ. मनोज भिसे, नितीन शिवदे, मेट्रन माधुरी कांबळे, परिचारिका स्मिता राणे, रूपाली भगत, समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ; तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
मनोरुग्णांचे आधारवड
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय मानसिक आरोग्य बिघडलेल्या रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना बरे केले जाते. मात्र, अनेक रुग्णांना त्यांच्या नातेवाइकांकडून घरी घेऊन जाण्यास टाळाटाळ केली जाते. बेवारस रुग्णांची अवस्था तर खूपच दयनीय असते. या रुग्णांना घराचा पत्ता व्यवस्थित सांगता येत नसल्याने घरी पोहचवण्याची कसरत रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना करावी लागते.
मानसिक आरोग्य उपचारात वैद्यकीय सेवेसोबत पुनर्वसनही तितकेच महत्त्वाचे आहे. कुटुंबाची भूमिका खूप मोलाची आहे. त्यांच्या प्रेमातूनही रुग्ण लवकर बरा होण्यास मदत मिळते. त्यामुळे कुटुंबाने जबाबदारी झटकता कामा नये.
- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे
ठाणे : मरिन ड्राईव्ह येथे सापडलेल्या मनोरुग्णाला प्रकृती स्थिर झाल्यानंतर कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.