डीसॅलिनेशन प्रकल्पाला मच्छिमारांचा तीव्र विरोध

डीसॅलिनेशन प्रकल्पाला मच्छिमारांचा तीव्र विरोध
Published on

क्षारविरहितीकरण प्रकल्पाला विरोध
मनोरी-गोराई किनारपट्टीवरील मच्छीमारांनी सर्वेक्षण रोखले

मालाड, ता. २८ (बातमीदार) : मार्च महिना संपता संपताच उन्हाच्या तीव्र झळा असह्य होऊ लागल्या आहेत. ग्रामीणप्रमाणेच शहराच्या काही भागांतही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशात नागरिकांच्या पाण्याची पूर्तता करण्यासाठी महापालिका विविध योजना राबवताना दिसत आहे. खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणे (क्षारविरहितीकरण, डीसॅलिनेशन) या प्रकल्पावर मुंबई महापालिकेकडून ठोस उपाययोजना राबवण्यात येत आहे. दरम्यान, पालिकेच्या याच प्रकल्पाला उपनगरातील महत्त्वाच्या अशा मनोरी व गोराई येथील मच्छीमारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. पालिकेचे अधिकारी समुद्रकिनारी सर्वेक्षण करायला गेले असता गुरुवारी (ता. २६) मच्छीमार संघटनांनी मात्र विरोध दर्शवत हे सर्वेक्षण रोखले. यासंदर्भात प्रशासनाशी याबाबत संपर्क साधला, पण तो होऊ शकलेला नाही.
यासंदर्भात मच्छीमारांच्या विविध संघटनांनी एकत्र येत हा प्रकल्प मच्छीमार बांधवांसाठी कशाप्रकारे तोट्याचा आहे याची माहिती दिली. यासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. या सभेदरम्यान नॅशनल फिशवर्कर्स फोरम (एनएफएफ)चे अध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी चेन्नईतील अशा प्रकल्पांना होत असलेल्या विरोधाचा संदर्भ दिला. अशा प्रकल्पांमुळे मासेमारीवर कोणताच परिणाम होत नाही, हा पालिकेचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. क्षारविरहितीकरणामुळे लहान जातींचे मासे संपुष्टात येतात आणि खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतरण करताना जे पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाते त्यामुळे समुद्रात क्षाराचे प्रमाण वाढते, असेही तांडेल यांनी सांगितले.
दुसरीकडे महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी थेट पालिकेच्या सादरीकरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्या देशात पावसाचे पाणी अडवून व्यवस्थापन करण्याऐवजी समुद्रकिनाऱ्यावर असे प्रकल्प आणणे किती योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यानंतरच्या मासेमारीचा उल्लेख करताना त्यांना सांगितले, की गोड्या पाण्याच्या प्रवाहामुळे किनारी भागात मोठ्या प्रमाणात मासे उपलब्ध होतात. त्यावर त्यांचा उदरर्निवाह अवलंबून आहे. या प्रकल्पांमुळे हा नैसर्गिक चक्र बाधित होण्याची भीती कोळी यांनी व्यक्त केली.
------------------
दररोज ५०० दशलक्ष लिटर पाणी प्रक्रियेतून फक्त २०० दशलक्ष लिटर पाणी शुद्ध केले जाणार आहे. म्हणजेच उर्वरित ३०० दशलक्ष लिटर पाणी पुन्हा समुद्रात सोडण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा समुद्री जैवसाखळीवर गंभीर परिणाम होण्याची भीतीही मच्छीमार बांधवांनी या वेळी व्यक्त केली. तसेच मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि श्रीमंतांसाठी उभारले जाणारे प्रकल्प यासाठी आमच्या उदरर्निवाहावर गदा का आणता, असा सवालही या वेळी त्यांच्या वतीने करण्यात आला.
-----------
कोट
या बैठकीत मढ, मनोरी, उत्तन, भाटी, मालवणी आदी परिसरातील विविध मच्छीमार सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत प्रकल्पाच्या विरोधात सविस्तर मते मांडली.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मच्छीमारांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले असून, लेखी निवेदन देण्याची विनंतीही आम्ही केली आहे.
- किरण कोळी, सरचिटणीस, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com