

घणसोलीत रस्त्याचे काम रखडले
नागरिकांचा संताप वाढला
तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : घणसोली येथील सेक्टर आठमधील संत निरंकारी चौक ते सेक्टर १६ आगरी चौकदरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला मोठा विलंब होत आहे. गेल्या वर्षभरापासून हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
संत निरंकारी चौक ते सेक्टर १६ आगरी चौक मार्गावर दवाखाने व इतर अत्यावश्यक सेवा केंद्रे मोठ्या प्रमाणावर आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणि सुरू असलेल्या खोदकामामुळे रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. तसेच, कामामुळे उडणाऱ्या धुळीचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नाईक आणि रोहन पाटील यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदाराला पालिका अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीमुळे वारंवार मुदतवाढ दिली, तरीही काम पूर्ण करण्यात ठेकेदार अपयशी ठरला आहे. पालिका प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला अनेक वेळा लेखी सूचना देऊनही कामाची गती वाढलेली नाही. त्यामुळे या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेकडून केली आहे. दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली असून, तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.