नऊ कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून वाद

नऊ कर्मचाऱ्यांच्या निलंबनावरून वाद
Published on

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेतील प्रभाग समिती क्र. १ ते ५ मधील झोपडपट्टी विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस न देता १८ मार्चपासून तत्काळ निलंबित करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या कारवाईविरोधात भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, भिवंडी युनिटकडून प्रशासनाकडे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी १८ मार्चला महापालिका प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर महापौर व आयुक्तांसोबत चर्चा झाली. त्यानंतरही निर्णय न झाल्याने २३ मार्चला महापौर नारायण चौधरी यांच्या दालनात पुन्हा बैठक झाली. याला पाच दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. महासंघाने प्रशासनाला स्मरणपत्र देत २८ मार्चपासून प्रभाग समिती क्र. १ ते ५ मधील सर्व वसुली कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून काम सुरू केले आहे. ५ एप्रिलपर्यंत हा निषेध सुरू राहणार आहे. या कालावधीत प्रशासनाने पर्यायी निर्णय न घेतल्यास ६ एप्रिलपासून महापालिकेसमोर दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.

कोट्यवधींचे नुकसान
महासंघाच्या म्हणण्यानुसार, झोपडपट्टी विभागातील नऊ प्रभाग लिपिकांना निलंबित केल्यामुळे महापालिकेला अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यासाठी उपआयुक्त (कर) विभाग आणि उपआयुक्त (सामान्य प्रशासन) जबाबदार असून, ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी महासंघाने आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणामुळे महापालिकेतील वातावरण तापले असून, प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com