

शहापूर, ता. ३० (वार्ताहर) : तालुक्यातील वाशाळा वनक्षेत्रात झालेल्या बिबट्या हत्येप्रकरणी दीड महिना उलटूनही तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना अटक करण्यात वनविभागाला अपयश आले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, वन्यजीव संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फेब्रुवारीत वाशाळा वनक्षेत्रपालांच्या हद्दीत अडीच वर्षांच्या बिबट्याचा मृतदेह आटलेल्या नदीपात्रात आढळून आला होता. या प्रकरणात बिबट्याची शिकार करून त्याचे पंजे, नखे आणि मिशा कापून नेल्याने क्रूरतेचा कळस गाठल्याचे स्पष्ट झाले होते. अघोरीसाठी ही हत्या केल्याचीही चर्चा होती. या गुन्ह्यात वनविभागाने दोन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत डांबले होते. मात्र, १२ दिवसांच्या कोठडीनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. दरम्यान, याच प्रकरणातील अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध लागलेला नाही. वाशाळा वनक्षेत्रात यापूर्वीही वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालावा; तसेच जंगलांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करावे, अशी मागणी पंचक्रोशीतून जोर धरत आहे.
आरोपींचा शोध सुरू
बिबट्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना जामीन मिळाला आहे. उर्वरित तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल एकनाथ रोंगटे यांनी दिली.