

शहापूर, ता. ३० (वार्ताहर) : महाड क्रांतीच्या शताब्दी वर्षानिमित्त सार्थक साहित्य प्रकाशनच्या वतीने ‘क्रांती सूर्याचं देणं’ या विशेष प्रातिनिधिक काव्यसंग्रहासाठी राज्यभरातील कवींना कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘क्रांती सूर्य’ बी. आर. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित हा काव्यसंग्रह समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या महान लढ्याला शब्दरूप अभिवादन करण्याच्या उद्देशाने प्रकाशित केला जाणार आहे. या उपक्रमातून महाड क्रांतीच्या ऐतिहासिक वारशाचे पुनरुज्जीवन करत आंबेडकरी विचार अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काव्यसंग्रहासाठी नामवंत, तसेच नवोदित कवींना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. समता, सामाजिक न्याय, मानवता; तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, मौलिक विचार, सत्याग्रह आणि महाड क्रांती या विषयांवर आधारित आशयघन, दर्जेदार व मानवतावादी कविता पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक कवींनी सार्थक साहित्य प्रकाशनचे प्रा. आशा रणखांबे व साहित्यिक नवनाथ रणखांबे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.