

डोंबिवली एमआयडीसीत सर्वत्र सांडपाणी
फुटलेल्य वाहिन्यांमुळे डासांचा प्रादुर्भाव; रहिवाशांचे आरोग्य टांगणीला
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसी निवासी विभाग सध्या अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला असून, उन्हाळ्यातही येथे डासांच्या झुंडी पाहायला मिळत आहेत. चाळीस वर्षे जुन्या ड्रेनेज वाहिन्या आणि चेंबर्स जागोजागी फुटल्याने सांडपाणी थेट पावसाळी गटारे आणि नाल्यांमध्ये साचत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कावेरी चौक, ओमकार स्कूल, एकदंत हेरिटेज आणि कोयना सोसायटी परिसरातील मोठ्या नाल्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. एमआयडीसीच्या ठेकेदारांकडून सुरू असलेल्या या कामांमुळे अनेक ठिकाणी सांडपाणी अडकले आहे. नाले कचरा आणि प्लॅस्टिकने तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी डासांची पैदास वाढली असून, रहिवाशांचे जगणे कठीण झाले आहे. सततच्या अस्वच्छतेमुळे स्थानिक दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. "बेसुमार डासांमुळे मलेरिया, डेंगी आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे," असा इशारा स्थानिक डॉक्टर रेखा फणसे आणि डॉ. राजन माने यांनी दिला आहे. दरम्यान, केडीएमसीकडून केली जाणारी धुरीकरण आणि फवारणी मोहीम कुचकामी ठरत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. येथील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज दुरुस्ती आणि नालेसफाई न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. केडीएमसी आणि एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.
प्रशासकीय समन्वयाचा अभाव
निवासी भागातील ड्रेनेज आणि नाल्यांची कामे एमआयडीसी करते, तर कचरा सफाई आणि आरोग्यसेवांची जबाबदारी केडीएमसीकडे आहे. मात्र, या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.