

वांद्री नदीपुलाच्या दुरुस्तीने कोंडी
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या रांगा
मनोर, ता. ३० ः वांद्री नदीवरील पुलाच्या दुरुस्तीसाठी रविवारी रात्रीपासून मुंबई वाहिनीवरील अवजड वाहतूक गुजरात वाहिनीमार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वरई ते दुर्वेस यादरम्यान वाहनांच्या १० किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागत आहेत.
आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे इंधन टंचाईची स्थिती आहे. अशातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या चुकीच्या नियोजनाने मुंबई वाहिनीवरील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे इंधनाचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच वाहनचालकांना तासंतास रखडत असल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, दुरुस्तीचे काम एक महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याने मनोर ते वरई फाटा, ढेकाळेपर्यंत प्रवासी वाहतुकीसह विद्यार्थी, नोकरदारवर्गाला फटका बसणार आहे.
-----------------------------
तीन महिन्यांत पुन्हा दुरुस्ती
- सातिवली उड्डाणपुलाच्या कामामुळे सलग सहा महिने कोंडी सहन करावी लागली होती. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटली होती, परंतु अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा वरई गावाच्या हद्दीतील वांद्री नदीपुलाची दुरुस्ती करण्यात येत आहे.
- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था तसेच ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
------------------------------
कुडे-दुर्वेस येथे उलट दिशेने येणारी वाहने अडवण्यासाठी महामार्ग सुरक्षा विभागाकडून कर्मचारी नियुक्त केले आहेत. कोंडी सोडवण्यासाठी अधिकारी जातीने लक्ष घालत असून, लवकरच वाहतूक सुरळीत होईल.
- पवन ठाकूर, सहाय्यक पोलिस निरीक्षण, महामार्ग सुरक्षा विभाग, दुर्वस सहाय्यता केंद्र