गॅसटंचाईचा नवी मुंबईत फटका

गॅसटंचाईचा नवी मुंबईत फटका
Published on

जेवण, नाश्त्याचे गणित बिघडले
गॅसटंचाईचा नवी मुंबईत फटका
वाशी, ता. ३० (बातमीदार) ः नवी मुंबई शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई आणि वाढते दर यामुळे हॉटेल, खाणावळी व्यावसायिक अडचणीत आले असून, सर्वसामान्यांच्या जेवण, नाश्त्याचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून गॅसपुरवठा विस्कळित असल्याने व्यावसायिकांना वाढीव दराने सिलिंडर घ्यावे लागत आहेत. परिणामी खाद्यपदार्थांच्या किमतीतही २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होत आहे.
नवी मुंबईत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्ग रोजच्या जेवणासाठी हॉटेल व मेसवर अवलंबून आहे. दरवाढीमुळे या वर्गाचे मासिक बजेट कोलमडले आहे. काही ठिकाणी नाश्ता आणि जेवणाच्या प्लेटच्या दरात १० ते २० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, तर चहा आणि अल्पोपहारदेखील महागला आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या मते, गॅस सिलिंडरचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्याने मेन्यूतील काही पदार्थ बंद करावे लागले आहेत, तर काही हॉटेलांनी तात्पुरते शटर खाली करण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी इलेक्ट्रिक शेगड्या, इंडक्शन किंवा कोळशाचा वापर सुरू केला आहे.

काळ्याबाजाराला ऊत
गॅसटंचाईमुळे काळ्याबाजारालाही ऊत आला असून, १,८०० ते २,००० रुपयांचे व्यावसायिक सिलिंडर चार हजार ते पाच हजार रुपयांना विकले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे लहान विक्रेते आणि हातगाडीधारकांना सर्वाधिक आर्थिक फटका बसत आहे. त्यातच तेल, डाळी, मसाले आणि भाजीपाल्याच्या दरातही वाढ झाल्याने खाद्य व्यवसायाचे गणित अधिकच बिघडले आहे. गॅसटंचाई आणि महागाईच्या दुहेरी फटक्यामुळे नवी मुंबईतील खाद्यव्यवसाय संकटात सापडला आहे.

खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ
पदार्थ आधीचे दर आताचे दर
वडापाव १५ २०
भजी ३० ४०
पोहे ३० ४०
उपमा ३० ४०
शिरा ३० ४०
इडली ४० ६०

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com