

अवयवदानाने मिळाले नऊ जणांना जीवनदान
- महावीर जैन हॉस्पिटलच्या पुढाकाराने प्रक्रिया यशस्वी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता . ३० : रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३३ वर्षीय तरुणाचा ब्रेन डेड झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला; मात्र कुटुंबीयांच्या संवेदनशील निर्णयामुळे त्याच्या अवयवदानातून तब्बल नऊ रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलच्या पुढाकाराने ही संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.
रविवारी (ता. २९) हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये संबंधित तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयवदानाबाबत माहिती दिली असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अवयवदानास संमती दिली. हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. रणवीर कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अवयव संकलनाची प्रक्रिया राबविण्यात आली. हृदय, दोन किडन्या, लिव्हर, पॅन्क्रियास, कॉर्निया आणि बोन टिश्यू असे विविध अवयव संकलित करण्यात आले. विशेष म्हणजे लिव्हरचे ‘स्प्लिट लिव्हर’ तंत्राद्वारे दोन भाग करून दोन रुग्णांना देण्यात आले. त्यापैकी एका नऊ वर्षीय बालकावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.
ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने हृदय, लिव्हर आणि किडनी २४ तासांच्या आत मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णालयांमध्ये नऊ रुग्णांवर तातडीने प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे ४० डॉक्टरांच्या पथकाने सहभाग घेतला.
हे अवयव एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल, मॅक्स नानावटी हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल तसेच सहीयारा बोन बँक येथे पाठविण्यात आले. या वेळी डॉक्टरांनी ब्रेन डेड प्रक्रियेबाबत माहिती देताना सांगितले, की रुग्ण पूर्णपणे ब्रेन डेड असल्याची खात्री झाल्यानंतरच आणि शासनाच्या नियमांनुसार तपासणी पूर्ण केल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविली जाते.
अवयवदानाबाबत बोलताना ट्रस्टी अजय आशर यांनी सांगितले, की अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, सामाजिक चळवळ आहे. देशात सध्या किडनी प्रत्यारोपणासाठी सुमारे ६० ते ७० हजार रुग्ण प्रतीक्षेत आहेत. लिव्हर आणि फुप्फुसाच्या रुग्णांची संख्यादेखील मोठी आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे.