

तलाव सुशोभीकरणासाठी सारडे विकास मंचाचा पुढाकार
उरण, ता. २ (बातमीदार) ः मार्च महिन्यातच तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे जलसाठ्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. अशात, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी सारडे विकास मंचने पुढाकार घेतला आहे. मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सारडे गावातील तलावाच्या सुशोभीकरणाचे आणि स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक आदिवासीवाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत, तर पक्षी व प्राणीही वाढत्या उष्णतेमुळे गाव परिसरातील तलावातील पाण्याच्या आसरा घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमवीर सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी सारडे गावातील तलावाच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी तलाव संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. यानुसार नागेंद्र म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तलावातील परिसर स्वच्छ केला आहे.
अनेक पाणलोट क्षेत्राची दुरवस्था
शासनाच्या उदासीन धोरणामुळे अनेक गावांतील पाणलोट क्षेत्राची दुरवस्था होत आहे. त्याचा फटका हा उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या माध्यमातून नागरिकांना व पक्षी-प्राण्यांना सहन करावा लागत आहे. तरी प्रत्येकांनी आपआपल्या परिसरातील पाणलोट क्षेत्रातील स्रोत वाढविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन नागेंद्र म्हात्रे यांनी केले.