

अंबरनाथ, ता. २ (वार्ताहर) : वाढती लोकसंख्या आणि नागरी गरजांच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिकेने मालमत्ता करवसुलीत पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत सलग चौथ्यांदा यशाचा मान पटकावला आहे. चालू आर्थिक वर्षात तब्बल ९४.०५ टक्के वसुली करत पालिकेने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
पालिकेने यंदा करवसुलीसाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवत वर्षभर विविध उपाययोजना राबवल्या. विशेषतः थकीत करवसुलीसाठी राबविलेल्या ‘अभय योजने’ला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत विलंब शास्तीवर ५० टक्के सवलत दिल्याने थकबाकीदारांनी मोठ्या प्रमाणावर कर भरण्यास प्राधान्य दिले. शहराची लोकसंख्या चार ते पाच लाखांच्या घरात असून, एकूण एक लाख ४२ हजार मिळकती नोंद आहेत. कर बिलांची संख्या दोन लाख २५ हजार आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन विभागांत विभागलेल्या शहरात मालमत्ता कराची एकूण आकारणी ५९.६१ कोटी रुपये होती. त्यापैकी ५५.५८ कोटी रुपयांची वसुली करण्यात पालिकेला यश आले. याशिवाय विविध करांमधून मिळून ९९.५४ कोटी रुपयांच्या उद्दिष्टापैकी ८२.६० कोटी रुपयांची वसुली केली आहे. या भक्कम महसुलामुळे शहरातील विकासकामांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शहरभर वसुली शिबिरे, घरोघरी जाऊन वसुली, जप्तीपूर्व नोटिसा अशा विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. कर अधिकारी नरेंद्र संखे, प्रतीक्षा सावंत, प्रशांत राणे, नवनीत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम यशस्वी केली. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत कर विभागाचे मोलाचे योगदान राहिले. दरम्यान, शिक्षण व वृक्ष कराच्या वसुलीतही समाधानकारक कामगिरी झाल्याने पालिकेच्या महसुलात वाढ झाली आहे. अंबरनाथ पालिकेने करवसुलीत सलग चौथ्यांदा दमदार यश मिळवले आहे.
अभय योजनेमुळे दिलासा
अभय योजनेमुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला. घरपट्टीवरील ५० टक्के शास्ती सवलतीमुळे नागरिकांचा प्रतिसाद वाढला. कर भरणा सुलभ करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. नागरिकांनी या सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत पोर्टलद्वारे सुमारे १७.९६ कोटी रुपयांचा कर भरला, अशी माहिती नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे पाटील यांनी दिली.