

अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : शहरात विकासकामांचा वेग झपाट्याने वाढत असताना लहान मुलांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याचे विदारक चित्र अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीपाडा परिसरात समोर आले आहे. खेळण्यासाठी मैदान किंवा सुरक्षित खुली जागा नसल्याने येथील चिमुकल्यांनी थेट नगरसेवकांकडे हात जोडून भावनिक विनंती केली आहे. ‘आम्हाला खेळायला जागा द्या!’ या आर्त हाकेला समाज माध्यमांवर मोठा प्रतिसाद मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लहान मुले अत्यंत निरागसपणे आपली व्यथा मांडत आहेत. नुकत्याच त्यांच्या परीक्षा संपल्याने मुले खेळण्यासाठी बाहेर पडत आहेत; मात्र परिसरात सुरक्षित जागेचा अभाव आहे. घरासमोर उघडी गटारे असल्याने त्यात पडण्याची भीती सतत निर्माण होते. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गटारांवर लादी बसविण्याची मागणी मुलांनी नगरसेवकांकडे केली आहे. याशिवाय, परिसरातील कचऱ्याची कुंडी हटवून त्या ठिकाणी छोटेखानी खेळाचे मैदान उभारावे, अशीही मागणी या मुलांनी केली आहे. सध्या उघडी गटारे, कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता यामुळे परिसरातील वातावरण अत्यंत असुरक्षित झाले आहे. याचा थेट परिणाम मुलांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवीन भेंडीपाड्यातील या चिमुकल्यांचा व्हायरल व्हिडिओ हा केवळ भावनिक क्षण नसून, तो प्रशासन आणि पालक या दोघांच्याही डोळ्यात अंजन घालणारा ठरत आहे.
समर कॅम्पची मागणी
आजच्या घडीला मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याची तक्रार सर्वत्र ऐकू येते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पालकांनी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी समर कॅम्पची मागणी केली होती. मात्र, मुलांना खऱ्या अर्थाने मोबाईलपासून दूर ठेवायचे असेल, तर त्यासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज खेळाची मैदाने उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. समर कॅम्प हे तात्पुरते समाधान ठरू शकते, असे मत ज्येष्ठांकडून व्यक्त होत आहे.