

उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प १ येथील आझाद नगर परिसरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. सकल हिंदू समाज आणि एसएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच भाजप नगरसेविका सुचित्रा सिंग यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या कार्यक्रमात ५०१ भाविकांनी एकत्र येत सामूहिक हनुमान चालीसा पठण केले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक धार्मिक विधींनी झाली. भगवान हनुमानांना ११-११ किलो वजनाचे पाच लाडू केक स्वरूपात अर्पण करून भोग लावण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या एकसुरात झालेल्या पठणाने श्रद्धेचा उत्कट आविष्कार पाहायला मिळाला. यानंतर जय श्रीरामच्या जयघोषात भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ५५ किलो लाडूंचा महाप्रसादही भाविकांना वितरित करण्यात आला. कार्यक्रमाला भाजप नेते, स्थानिक पदाधिकारी आणि समाजातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. हनुमान जयंती महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून, यंदा विक्रमी सहभाग नोंदवल्याची माहिती नगरसेविका सुचित्रा सिंग यांनी दिली.