अस्मानी संकट, वाढीव खर्चामुळे शेती करणे झाले कठीण

अस्मानी संकट, वाढीव खर्चामुळे शेती करणे झाले कठीण
Published on

शेतकऱ्यांचे बटई पद्धतीकडे कल
अस्मानी संकट, वाढीव खर्चामुळे शेती करणे झाले कठीण

जव्हार, ता. ७ (बातमीदार) : निसर्गरम्य अशा जव्हारमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. या आदिवासीबहुल पट्ट्यात पारंपरिक तसेच प्रगत तंत्रज्ञान वापरून शेती करण्यात येत आहे. मात्र, निसर्गाचा लहरीपणा, अवकाळी पाऊस, रोगाचा प्रादुर्भाव आणि वाढती महागाई या अस्मानी संकट, वाढीव खर्चामुळे शेती करणे कठीण झाले असून, येथील शेतकरी चक्क बटई पद्धतीकडे वळल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

शेतीमालाला मिळणारा अत्यल्प भाव आणि दिवसेंदिवस गगनाला भिडणारा उत्पादन खर्च, यामुळे जव्हार परिसरातील शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. एकेकाळी स्वतःची जमीन अभिमानाने कसणारा बळीराजा आता आर्थिक विवंचनेमुळे स्वतःच्याच शेतीपासून दुरावू लागला आहे. शेती करणे आता कष्टाचे आणि तोट्याचे ठरू लागल्याने, स्वतः जोखीम घेण्याऐवजी शेती बटई पद्धतीने दुसऱ्याला कसण्यासाठी देण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा कमालीचा वाढला आहे.
------------
आधुनिकतेची जोड, निसर्गाचा अडथळा

मजुरांची कमतरता आणि वाढलेला खर्च पाहता अनेक शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळले आहेत. पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर, बैलांच्या कमतरतेमुळे मशागतीसाठी यंत्रांचा वापर आणि शेतातील तण काढण्यासाठी महागड्या तणनाशकांचा वापर केला जात आहे. मात्र, शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने, पीक प्रत्यक्ष बाजारात विकेपर्यंत शेतकऱ्याला कोणताही भरवसा उरलेला नाही. कष्ट करूनही हाती काहीच लागत नसल्याने बटई हाच सुरक्षित मार्ग त्याला वाटू लागला आहे. शेतकऱ्यांची मोठी ससेहोलपट झाली आहे. महागाईमुळे शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते आणि मशागतीचे दर प्रचंड वाढले आहेत. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासारखे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी पदरी पुरेसे उत्पन्न पडत नसल्याने, शेतकरी आता नवीन हंगामात मोठी गुंतवणूक करण्यास धजावत नाही. त्यातच मजुरांची टंचाईमुळे शेतीचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे.

--------------------
वाढत्या महागाईचा सामना हा मजूर आणि सालगड्यांनाही करावा लागतो. जर शासकीय कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढ मिळते, तर मग घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांनी वाढीव दराची मागणी केल्यास त्यात वावगे काय? महागाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे.
- रवींद्र गवते, शेतकरी
------------

शेती नफ्यात आहे की तोट्यात, हे ठरवण्यापेक्षा वाढलेला उत्पादन खर्च आणि मजुरांची कमतरता पाहता हा व्यवसाय आता धोक्यात आला आहे. शेतीसाठी लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसत नाही. सरकारने शेतीमालाला योग्य भाव देण्याची नितांत गरज आहे.
वंदना दरोडा, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com