

उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांचा ताडगोळ्यांकडे कल
मागणी वाढल्याने विक्रेत्यांना सुगीचे दिवस
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर ता. ६ (बातमीदार) ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे कडाक्याच्या उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागत असून, अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून शरीराला थंडावा मिळवण्यासाठी नागरिकांचा कल ताडगोळ्यांच्या खरेदीकडे आहे.
एप्रिल महिन्यातील कडक उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांचा मोर्चा रसदार फळे, शीतपेये, फळांचे रस आणि पाण्याकडे वळला आहे. सध्या बाजारात कलिंगड, खरबूज, द्राक्ष, लिंबूपाणी, उसाचा रस यांसोबतच ताडगोळ्यांनाही मोठी मागणी आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक आणि वाशी यांसारख्या बाजारपेठांमधून ताडगोळ्यांची मुंबई शहरासह उपनगरांत मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे.
ताडगोळ्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असून, ब-जीवनसत्त्व, लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. हे फळ पचायला हलके असून, पोटातील उष्णता कमी करण्यास उपयुक्त ठरते.
उन्हामुळे होणारी जळजळ आणि थकवा दूर करण्यासाठी ताडगोळे वरदान ठरत आहेत. चवीला गोड आणि शीतल असल्यामुळे त्यांना ‘आइस ॲपल’ असेही म्हटले जाते. वाढत्या उन्हात ताडगोळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. सध्या शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या कडेला ताडगोळे विक्री होत असून, उन्हाने त्रस्त नागरिक ताडगोळ्यांचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ताडगोळ्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून, सध्या सुगीचे दिवस आल्याचे विक्रत्यांनी सांगितले.
डझनामागे १५० ते २०० रुपये
ताडगोळे डझनामागे १५० ते २०० रुपये किंवा नगानुसार विकले जात आहेत. डहाणू, बोर्डी, रायगड, पालघर जिल्हा तसेच कोकण किनारपट्टी आणि दक्षिण भारतातून ताडगोळे विक्रीसाठी येत आहेत. वाढत्या उन्हात ताडगोळे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
उन्हाचा तडाखा असह्य होत आहे. शीतपेयांपेक्षा नैसर्गिक ताडगोळे खाणे शरीरासाठी अधिक चांगले आहे. यामुळे तत्काळ थंडावा मिळतो.
- भारती गायकवाड, ग्राहक
सध्या ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे. दिवसेंदिवस खप वाढत असल्यामुळे आमच्यासाठी सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे आम्ही आनंदित आहोत.
- विमल तोसावरा, विक्रेते
ताडगोळे उन्हाळ्यात पौष्टिक आणि थंडावा देणारे फळ असले तरी त्याचे अतिसेवन टाळावे. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोट फुगणे, जुलाब, सर्दी किंवा साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ताडगोळे प्रमाणात खाणे गरजेचे आहे.
- डॉ. तृप्ती झोडगे, सर्जन
-----------------
मथळे आणि उपमथळे सूचवा
-------
ताडगोळ्यांच्या गारव्यासाठी रसाळ ओढ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.