

वज्रेश्वरी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील मैंदे-बिजपाडा येथील वनवासी पाड्यावर विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांत धर्माचार्य संपर्क आयाम (मुंबई शहर) यांच्या सहकार्याने धर्मजागृती व सेवा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून वनवासी समाजात जागृती घडवून आत्मनिर्भरतेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला मैंदे परिसरातील बिजपाडा, रावतेपाडा, बात्रेपाडा आणि पागीपाडा येथील ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना श्रीरामांची प्रतिमा, साड्या; तसेच खाऊ प्रसादाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून स्कूल बॅग, चटई, ब्लॅंकेट, चादरी आणि टॉवेल यांचेही वितरण करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रशांत गुरुजी यांनी आदिवासी समाजाचे महत्त्व, निसर्गाशी असलेले त्यांचे नाते आणि त्यांच्या परंपरांचा वारसा जपण्याची गरज यावर सविस्तर भाष्य केले. निसर्ग संवर्धनात आदिवासी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, आधुनिकतेच्या प्रभावामुळे त्यांच्या चालीरीती व परंपरा हरवण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबईहून आलेले प्रशांत गुरुजी, अभिषेक पेरवी, सागर शेंडे, अनिकेत खंडागळे यांच्यासह मातृशक्ती व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात स्थानिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपक्रमाचे स्वागत केले.