

महालक्ष्मी यात्रेत जीवाला घोर
धोकादायक ठिकाणांवर पर्यटकांची गर्दी; अपघातांचा धोका
कासा, ता. ९ (बातमीदार)ः मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत सूर्या नदीतील घोळ भराडजवळील ‘सासूचे नाक’ परिसरातील पाण्याचा प्रवाह यात्रेकरूंना आकर्षित करत आहे. पण नदीपात्रातील हा परिसर खोल खड्डे, तीव्र प्रवाहामुळे धोकादायक असल्याने अपघाताची भीती वर्तवली जात आहे.
मुंबई, ठाणे तसेच गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक डहाणूत दाखल होत आहेत. यात्रेत देवीचे दर्शन घेतल्यानंतर अनेक पर्यटक परिसरातील स्थळांना भेटी देत आहेत. महालक्ष्मी मंदिर परिसरातील आघाडी येथील सूर्या नदीकिनारी वसलेले ‘भीम बांध’ लोकप्रिय ठिकाण असून, येथे अंघोळ तसेच वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र, या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देवदर्शनानंतर नदीकाठावर जाण्याचा मोह टाळण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
---------------------------------
पोलिस, होमगार्ड तैनात
वाघाडी ग्रामपंचायतीकडून धोकादायक ठिकाणी जाऊ नये, यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच कासा पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस, होमगार्डचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तरीदेखील कडक उन्हामुळे पाण्याचा मोह आवरता येत नसल्याने काही पर्यटक धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
-------------------------------
भीम बांध परिसरात ग्रामपंचायतीकडून सूचनाफलक लावून पर्यटकांना इशारा देण्यात आला आहे. तरी काही जण धोका पत्करून पाण्यात उतरतात. यापूर्वी येथे अनेक अप्रिय घटना घडल्या आहेत.
- प्रशांत सातवी, सरपंच, वाघाडी ग्रामपंचायत