

खोडाळाकरांना मिळणार शुद्ध पाणी
खासदार डाॅ. हेमंत सवरांच्या सूचनेनंतर प्रशासन कामाला
सकाळ बातमीचा परिणाम
मोखाडा, ता. ९ ( बातमीदार ) : मोखाड्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथील नळ योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले होते. शिवाय तलावानेही तळ गाठल्याने नागरिकांना गाळ मिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी वापरावे लागत होते. यासंदर्भात दै. सकाळने ‘अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याच्या तक्रारी’ या मथळ्याखाली बुधवारी (ता. ८) बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची तातडीने दखल घेत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना खोडाळ्यामधील नागरिकांना नळ पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाणी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करत येत्या आठवडाभरात खोडाळाकरांना शुद्ध पाणी देण्याची हमी दिली आहे.
मोखाड्यातील खोडाळा येथील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशात येथील नळ योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले आणि पाणी साठवण तलावानेही तळ गाठला. त्यामुळे ग्रामस्थांना आठवड्यात एकदाच मिळणारे पाणी गाळ मिश्रित, दुर्गंधीयुक्त व अशुद्ध मिळू लागले. यामुळे अनेक ग्रामस्थांना पोटाच्या विकारांचा सामनाही करावा लागला. या गंभीर विषयाला दै. सकाळने ‘अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याच्या तक्रारी’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केल्याने हा प्रश्न सर्वांसमोर आला.
या बातमीची दखल घेत खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठ्याचे पाणी, खोडाळ्यातील पाणी टाक्यांना जोडण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांच्या सूचनेनंतर जीवन प्राधिकरणाने तातडीन काम ही सुरू केले असून, आठवडाभरात काम परू्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करणार असल्याचे खासदारांना आश्वासन दिले आहे.
----------------
खासदार डाॅ. हेमंत सवरांच्या सूचनेनंतर नळ योजनेचे वाढीव काम करून खोडाळ्यात काम सुरू केले आहे. त्यासाठी पाइप ही ऊपलब्ध केले आहेत. तसेच खोदकाम करून पाइपलाइन, पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणार आहे. आठ, दहा दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीनेही सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- अजय मुळे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग