

किनाऱ्यालगतची बांधकामे नियमित करणार
कोळीवाड्यातील मच्छीमारांना दिलासा मिळणार; आक्षी-साखर बंदरात जेट्टीचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : अलिबाग किनारपट्टीवरील घरे नियमित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, मच्छीमारांना विविध योजनांचा लाभ देण्यावर विशेष भर दिला जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदर व मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी आक्षी साखर येथे केले. आक्षी खाडीमुखाशी साचलेल्या गाळामुळे निर्माण झालेल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर ग्रोयान्स जेट्टी, पोहोच रस्ता व नौकानयन मार्गातील गाळ काढण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी (ता. ९) त्यांच्या हस्ते झाले.
खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पात्र अरुंद झाले असून, मच्छीमारांना बोटी बंदरात आणण्यासाठी भरतीची प्रतीक्षा करावी लागत होती. त्यामुळे वेळ व आर्थिक नुकसान होत होते. नव्या प्रकल्पामुळे ही समस्या दूर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या वेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते. मच्छीमारांची निवासस्थाने असलेल्या कोळीवाड्यांच्या सिमांकनाचा विषय मागील अनेक वर्षे प्रलंबित आहे, तर काही ठिकाणी अतिक्रमण झालेले आहे. याबाबत बोलताना नितेश राणे यांनी समुद्रकिनाऱ्यालगतच्या घरांची बांधकामे नियमित केली जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्या हस्ते अलिबाग तालुक्यात अनेक पायाभूत सुविधांचे भूमिपूजन झाले.
आक्षी-साखर येथे १५९ कोटींच्या जेट्टीस मान्यता
अलिबाग परिसरात सुमारे १,१०८ मच्छीमार कार्यरत असून, वार्षिक ८,७४७ टन मत्स्य उत्पादन होते. आक्षी साखर परिसरात ८६३ मच्छीमारांकडून सुमारे २,२९७ टन मासळी उत्पादन घेतले जाते. या प्रकल्पास १५९ कोटी ९२ लाख रुपयांची प्रशासकीय, तर १५१ कोटी ७८ लाख रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पूर्वेकडे १,१२५ मीटर व पश्चिमेकडे १,११० मीटर अशा एकूण २,२३५ मीटर लांबीची लाटरोधक भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच ८० बाय १० मीटर आकाराच्या दोन जेट्टी, नौकानयन मार्गातील गाळ उपसा, जेट्टीमागील भराव व ४०० मीटर जोडरस्ता उभारला जाणार आहे. १२७.६१ कोटी रुपयांच्या निविदेनुसार हे काम यशोग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे देण्यात आले असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.