

घोलपनगरातील १४ इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा
पुनर्विकासात पारदर्शकतेची मागणी, रहिवाशांची संमती नसताना दबाव टाकल्याचा आरोप
कल्याण, ता. १२ ( वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पश्चिमेतील घोलपनगर येथील शेतकरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या १४ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. एकीकडे जीर्ण वास्तूंमुळे जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे पुनर्विकासाच्या नावाखाली विकसकाकडून मानसिक छळ आणि दबाव असल्याचा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे.
पावसाळ्यापूर्वी केडीएमसीच्या कारवाईने रहिवाशांची झोप उडाली आहे. इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. रहिवाशांचे म्हणणे आहे की, विकसक पुनर्विकास प्रक्रियेत धमकी देत आहे. रहिवाशांना संपूर्ण माहिती न देता आणि त्यांच्या संमतीशिवाय घाईघाईने निर्णय घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप होत आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून भाजपचे नगरसेवक दया गायकवाड, शिवसेनेचे नगरसेवक गणेश कोट यांनी घटनास्थळी भेट दिली. पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही रहिवाशाच्या हक्कांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. शेकडो कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.