

उलवे जि. प. शाळेत शिक्षकांची कमतरता अखेर दूर
सात वर्षांनंतर तीन शिक्षकांची नियुक्ती
उलवे, ता. १४ (बातमीदार) : उलवे (नवी मुंबई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या सात वर्षांपासून तीन शिक्षकांची कमतरता भासत होती. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत होती. मात्र, अखेर या प्रश्नाला सकारात्मक तोडगा निघाला असून, अवघ्या काही दिवसांतच तीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा परिषद सदस्या निकिता खारकर यांनी हा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठामपणे मांडला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे ही मागणी मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे सभेनंतर अवघ्या दोन ते चार दिवसांतच तीन शिक्षकांची नेमणूक करून त्यांना उलवे येथील शाळेत रुजू करण्यात आले.
या निर्णयानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनीही विमानतळ प्रकल्पग्रस्त गावातील शाळांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले. उलवे परिसरातील शाळांसह एकूण १० शाळांचे प्रश्न गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित होते. मात्र, जि.प. सदस्या निकिता खारकर, सोनाली जितेंकर, पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील, वितेश म्हात्रे तसेच ‘२७ गाव कमिटी’ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून अवघ्या १० दिवसांत हे प्रश्न निकाली काढण्यात आले.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेल्या तीन शिक्षकांची आज प्रत्यक्ष भेट घेऊन शाळेची पाहणी करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मोठी मदत होणार असून, पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.