घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त -राज्यपाल जिष्णु देव वर्मा

घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त -राज्यपाल जिष्णु देव वर्मा
Published on

घटनात्मक पायाभरणीमुळे लोकशाही सशक्त
राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचे प्रतिपादन

मुंबई, ता. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.
मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, की स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षण, संपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, यानिमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री ॲड. आशीष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री संजय राठोड, मंत्री संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापौर रितू तावडे उपस्थित होते. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मान्यवरांनी पुष्प अर्पण करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते सर्व भिक्खूंना चिवरदान देण्यात आले. या वेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एक वर्षाच्या कामकाजावर आधारित ‘समाजनायक संजय शिरसाट’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या वेळी आभार व्यक्त केले.
...
डॉ. आंबेडकर यांचे विचार कालसुसंगत!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य याविषयीचे विचार आजही कालसुसंगत आहेत. जागतिक पातळीवर अर्थकारणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करीत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्त्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहे, असेही स्पष्ट केले.
...
संविधान हाच राष्ट्रधर्म!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून, बाबासाहेब हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील शेवटच्या माणसालाही न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
...
विचारांचे स्मरण करण्याचा दिवस!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही प्रेरणा, संकल्प आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा तसेच त्यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉ. आंबेडकर यांच्या मानवकल्याणाच्या विचारांना पुढे नेणे आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण व वेगवान विकास साधणे हेच त्यांना खरे अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com