ग्रामीण भागात बसअभावी प्रवाशांचे हाल

ग्रामीण भागात बसअभावी प्रवाशांचे हाल
Published on

मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : कल्याण-अहिल्यानगर मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सावरणे, टोकावडे, धसई, म्हसा, तळेगाव, पळू, सोनावळे आदी परिसरातील नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाकडे (एसटी) ‘हात दाखवा-गाडी थांबवा’ बस सेवा तातडीने सुरू करण्याची ठाम मागणी केली आहे.
परिसरात अधिकृत बस थांबे नसल्यामुळे प्रवाशांना अनेकदा जीव धोक्यात घालून रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. परिणामी, खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने अपघातांचा धोका वाढत आहे. रायते पुलावरील अपघाताने ही गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आणली आहे. एसटी बसचालकांना प्रवाशांनी हात दाखवल्यावर गाडी थांबण्याचे निर्देश दिल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या या भागात अधिकृत बस थांबे नसल्याने प्रवाशांना लांब अंतर पायी चालावे लागते किंवा धोकादायक पद्धतीने रस्त्यावरून वाहने थांबवावी लागतात. त्यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ‘हात दाखवा–गाडी थांबवा’ सेवा सुरू केल्यास ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना सुरक्षित आणि परवडणारी प्रवास सुविधा मिळेल; तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील, अशी स्पष्ट मागणी प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com