

फणसाड अभयारण्यातील कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
श्रीकांत सुर्वे यांची गणेश नाईक यांच्याकडे मागणी
मुरूड, ता. १६ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात गेल्या सहा वर्षांत झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असून, या कामांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सुर्वे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना लेखी निवेदन दिले असून, भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जात असल्याचा आरोप केला आहे.
फणसाड अभयारण्यातील २०२० ते २०२६ या कालावधीत अभयारण्यात झालेली आणि सध्या सुरू असलेली कामे अंदाजपत्रकाप्रमाणे झालेली नसून निकृष्ट दर्जाची आहेत. अभयारण्य परिसरात कर्मचाऱ्यांच्या वास्तव्यासाठी लाखो रुपये खर्चून निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी एकही कर्मचारी राहत नाही. असे असूनही, याच इमारतींवर वारंवार दुरुस्तीचा खर्च दाखवून शासनाची फसवणूक केली जात असल्याचा दावा सुर्वे यांनी केला आहे. दुसरीकडे, प्राण्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कामे मात्र प्रलंबित आहेत. अधिकारी आणि कर्मचारी रात्रीची गस्त (पेट्रोलिंग) घालत नसल्याने सांबर व इतर प्राण्यांची शिकार होत आहे. तसेच साग आणि शिसम यांसारख्या मौल्यवान वृक्षांची कत्तल सुरू असल्याचेही सुर्वे यांनी म्हटले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय संबंधित ठेकेदारांची बिल अदा कर नये. या ऑडिटमुळे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यामधील आर्थिक भ्रष्टाचार उघडकीस येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करून अभायारण्यातील कामाची चौकशी करण्याची मागणी सुर्वे यांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.