

मुरूड तालुक्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
भाजप नेते पंडित पाटील यांची मागणी
मुरूड, ता. १९ (बातमीदार) : मुरूड शहरासह ग्रामीण भागातील रस्ते व मोऱ्यांची कामे माॅन्सूनपूर्वीच पूर्ण करावीत, अशी मागणी भाजप नेते पंडित पाटील यांनी केली. मुरूड नगर परिषदेत मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या दालनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी कर निरीक्षक अनिकेत जगदाळे, कार्यालयीन प्रशासक आंबेटकर, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता सांगळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदेश यादव, रमेश दिवेकर, धर्माज हिरवे, राजेश दिवेकर, विजय म्हात्रे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
पंडित पाटील म्हणाले, की मुरूड-साळाव रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनचालक सुपेगाव मार्गाचा वापर करीत आहेत. मात्र ऊसरोल ते फणसाड अभयारण्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुचाकीस्वार व प्रवाशांना अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा.
तसेच मुरूड नगर परिषदेने तवसाळकर लॉज व माडी केंद्रालगतच्या मोऱ्यांतील कचरा काढून त्यांचे नूतनीकरण करावे, अशीही त्यांनी मागणी केली.
चौकट
विभागीय समन्वयाची गरज
या रस्त्याचा काही भाग रोहा विभागाच्या अखत्यारीत येत असल्यास मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ समन्वय साधून काम पूर्ण करावे, असे निर्देश पंडित पाटील यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.