पालघरचा सहभाग अनिवार्य : राज्यपाल जिष्णू देव वर्मा

पालघरचा सहभाग अनिवार्य : राज्यपाल जिष्णू देव वर्मा
Published on

शेवटच्या घटकाचा विकास आवश्यक
राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचे प्रतिपादन

कासा, ता. १९ (बातमीदार) ः भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पपूर्तीसाठी समाजातील शेवटच्या घटकाचा सर्वांगीण विकास होणे अत्यावश्यक आहे. पालघर जिल्ह्याच्या प्रगतीशिवाय ‘विकसित भारत’ हे स्वप्न साकार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.
डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथे रविवारी आयोजित आरोग्य सुविधांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. वनबंधू ट्रस्ट व भारत विकास संगम यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम भागांसाठी फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यपाल म्हणाले, पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पालघरमध्ये ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्याचा मानस व्यक्त करत त्यांनी लवकरच जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला जाईल. तसेच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले. ‘अंत्योदय’ म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे, हीच खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. वनबंधू ट्रस्टतर्फे दुर्गम भागात फिरते दवाखाने, रुग्णवाहिका व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
----
राजभवनाचे दरवाजे सदैव खुले
चांगला अभियंता किंवा तंत्रज्ञ होणे महत्त्वाचे असले, तरी समाजासाठी कार्य करणारा जबाबदार नागरिक होणे अधिक मोठे आहे. पीडितांची सेवा करणे हाच खरा स्वर्ग आहे, असे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सांगितले. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राजभवनाचे दरवाजे सदैव खुले राहतील व पालघरच्या प्रगतीसाठी स्वतः लक्ष घालणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
----
या वेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष लाडूलाल सोनी, योगायतन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ समाजसेवक सुशील सिंघानिया आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लाडूलाल सोनी यांनी केले. डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रशासन व सामाजिक संस्थांच्या समन्वयातून दुर्गम भागाचा विकास कसा साधता येईल, यावर प्रकाश टाकला. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील आरोग्यसेवेची सद्यस्थिती व शासकीय योजनांची माहिती देत राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांना अधिक गती दिली जाईल, असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com