

उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील महत्त्वाच्या कामांमुळे तब्बल २४ तास वितरण बंद राहणार असल्याची माहिती उल्हासनगर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता परमेश्वर बुडगे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक एक, दोन व तीनवर उन्नतीकरण व तातडीच्या देखभाल कामांसाठी शुक्रवारी (ता. २४) काम हाती घेतले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते शनिवार (ता. २५) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. एस. ननवरे यांनी दिली आहे. या बंदचा परिणाम उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या क्षेत्रांसह औद्योगिक वसाहती, नगर परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि आसपासच्या ग्रामपंचायतींवर होणार आहे.
---
गुरुवारी मिरा-भाईंदरला पाणी नाही
भाईंदर (बातमीदार) : एमआयडीसीने जांभुळ येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाकरिता २४ तासांचा शटडाऊन घेतला आहे. या काळात एमआयडीसीकडून मिरा-भाईंदर शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मिरा-भाईंदर शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार आहे.