अमली पदार्थविरोधी कारवाईनंतर भीतीचे सावट

अमली पदार्थविरोधी कारवाईनंतर भीतीचे सावट
Published on

टिटवाळा, ता. २१ (वार्ताहर) : मुंबईतील नेस्को कॉन्सर्टनंतर टिटवाळ्यात सहा कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जागरूक नागरिकांनी एकत्र येत टिटवाळा पोलिस ठाण्यात निवेदन सादर करत तातडीने कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांना अटक करून धाडसी कारवाई केली होती. या कामगिरीचे नागरिकांनी स्वागत केले, तरी त्यानंतर उघडकीस आलेल्या ड्रग्स रॅकेटमुळे परिसरातील सुरक्षेबाबतची चिंता अधिकच तीव्र झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. टिटवाळा हा वेगाने विकसित होणारा परिसर असून येथे मोठ्या प्रमाणावर नवीन रहिवासी, भाडेकरू आणि फ्लॅट खरेदीदारांची वाढ होत आहे. मात्र, या नव्या रहिवाशांची पोलिस पडताळणी व्यवस्थित होत नसल्याने गुन्हेगारी प्रवृत्तींना वाव मिळत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज निवेदनातून अधोरेखित करण्यात आली आहे.

ठोस उपाययोजना कराव्यात
सखोल कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्याची मागणी केली असून अमली पदार्थांच्या विक्री व पुरवठा साखळीवर कठोर कारवाई करण्यावर भर द्यावा, तसेच भाडेकरू व नव्याने येणाऱ्या घरमालकांची सक्तीची पोलिस पडताळणी करणे, सोसायट्या व इमारतींनी रहिवाशांची माहिती पोलिस प्रशासनाला देणे बंधनकारक करणे, गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि नागरिक व पोलिस यांच्यात समन्वय वाढवणे, या मागण्याही ॲड. अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके, रोहित जोशी यांनी मांडल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com