

कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाली आहे. डोंबिवली शहराध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत पालिका क्षेत्रात ‘फेरीवाला (पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४’ लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत पाटील यांनी महापौर हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन दिले आहे. सध्या पालिकेकडून फेरीवाल्यांवर करण्यात येणारी कारवाई ही संबंधित कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करून होत असल्याचे त्यांनी सांगितले. फेरीवाले हे शहराच्या अर्थचक्राचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करणे गरजेचे आहे. मात्र, नियमनाऐवजी सरसकट कारवाई केल्यामुळे त्यांच्या रोजगारावर गदा येत असल्याचे पाटील यांनी नमूद केले. त्यामुळे पालिका हद्दीत फेरीवाला कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.