तलासरी बाजारपेठेत पावसाआधीच धोक्याची घंटा

तलासरी बाजारपेठेत पावसाआधीच धोक्याची घंटा
Published on

तलासरी बाजारपेठेत पावसाआधीच धोक्याची घंटा
गटाराचे काम रखडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

तलासरी, ता. २४ (बातमीदार) : सायवन-उधवा-तलासरी-संजाण या महत्त्वाच्या मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असले, तरी तलासरी बाजारपेठेत नियोजनातील त्रुटी स्पष्टपणे समोर येत आहेत. रस्ता तयार झाला असला, तरी पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी आवश्यक असलेले गटार बांधकाम अपूर्णच असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.

बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरण करताना, त्याची रुंदी सुमारे १० मीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्त्याची उंचीही पूर्वीपेक्षा दीड फुटांहून अधिक वाढवण्यात आल्याने रस्त्यालगतची दुकाने तुलनेने खालच्या पातळीवर गेली आहेत. परिणामी, पावसाळ्यात पाणी थेट दुकानांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, रस्ता उंचावताना पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचा कोणताही ठोस आराखडा राबवण्यात आलेला दिसत नाही. गटाराचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर बाजारपेठ पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, ‘रस्ता तयार करताना गटार बांधकामाला प्राधान्य देणे आवश्यक होते. मात्र, संबंधित यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. पावसाळ्यात जर पाणी दुकानात शिरले, तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.’ दरम्यान, सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत असून, काही ठिकाणी अपघाताचा धोका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नियोजनाअभावी कामे टप्प्याटप्प्याने न करता घाईघाईत पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही स्थानिकांकडून केली जात आहे.
------------------
दुकानात पाणी शिरण्याची भीती
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने गटार बांधकाम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. निचऱ्याची योग्य व्यवस्था झाली नाही, तर पावसाळा व्यापाऱ्यांसाठी संकट ठरेल, असे सांगत व्यापाऱ्यांना आपल्या दुकानात पावसाचे पाणी शिरण्याची भीती वाटत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com