ठाणे जिल्ह्यात विषमुक्त शेतीला भर द्या

ठाणे जिल्ह्यात विषमुक्त शेतीला भर द्या
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. रासायनिक खतांच्या वापरामुळे शेतीचा पोत खालावला जात आहे. त्यामुळे रसायनी खतांच्या वापरा कमी करून सेंद्रिय, शेणखत, जीवामृत अशा नैसर्गिक शेती करण्याला प्रोत्साहन देत, ‘विषमुक्त शेती’ करण्यावर अधिक भर देण्यात यावा, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवारी (ता. २७) खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. या वेळी आमदार किसान कथोरे, शांताराम मोरे, निरंजन डावखरे, राजेश मोरे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्यासह महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते. रासायनिक खतांमुळे जमिनीचा खालावलेला पोत सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. जमिनीचा कस सुधारल्यास चांगले दर्जेदार पीक घेता येईल. उत्पन्न जास्त येऊन खर्च कमी होण्यासदेखील मदत होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

यांत्रिकीकरणावर भर द्यावा!
जिल्ह्यात शेतीला, जनावरांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाझर तलाव, गाव तलाव यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन उन्हाळ्याच्या काळातदेखील भाजीपाला लागवड करता होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. भातलावणीसाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम भातशेतीवर होतो. भातशेती करताना यांत्रिकीकरणाच्या वापरावर अधिक भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या.

खर्च कमी, उत्पन्न अधिकसाठी प्रोत्साहन
ठाणे जिल्ह्यात सुरण लागवडीवर भर देण्यात यावा, यासाठी आमदार किसान कथोरे यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार सुरण लागवडीवर भर देत, १५० शेतकऱ्यांना कंद वाटप करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. काळीमिरी, सोनचाफा, फणस, जरबेरा आणि भेंडी लागवडीवर अधिक भर देण्यात यावा. यामध्ये खर्च कमी आणि उत्पन्न अधिक अशा प्रकारचे पिके घेण्यास प्रोत्साहन देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

दुबार शेतीची वेळ येऊ नये
ग्रामीण भागात आजही भात, नागली यासह फळ भाज्यांची पिके घेतली जातात. त्यात यंदा अपेक्षेप्रमाणे कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान खात्याकडून वेळोवेळी माहिती देऊन, नंतरच शेतीची कामे करावी, शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार शेतीची वेळ येऊ नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा कृषी विभागाला दिल्या.

खतांच्या काळाबाजारावर कठोर कारवाई
मागील वर्षी भिवंडी तालुक्यात खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची बाब जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पचे यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिली. त्यावर, खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांना खाते देण्यापूर्वी त्या खतांचा दर्जा तपासण्याच्या सूचना शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या.

Marathi News Esakal
www.esakal.com