महाराष्ट्र दिनी वसई विजयोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र दिनी वसई विजयोत्सवाचे आयोजन
Published on

वसई विजयोत्सवाचा महाराष्ट्रदिनी जल्लाेष
तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल
विरार, ता. २८ (बातमीदार)ः चिमाजी आप्पांनी पोर्तुगिजांवर मिळवलेल्या विजयाच्या निमित्ताने वसई किल्ल्यामध्ये महाराष्ट्रदिनी विजयोत्सव साजरा होणार आहे. वसई-विरार शहर महापालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळ आणि वसई विजय स्मारक समिती यांच्या सहकार्याने होणाऱ्या उपक्रमात तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
बालजत्रा, पारंपरिक खाद्य महोत्सव, आरमार, शस्त्र प्रदर्शन, शिवदुर्ग प्रतिकृती, शिवकालीन नाणी, मोडी लिपीतील पुरातन दस्तऐवजांचे प्रदर्शन शुक्रवारी (ता.१) पाहायला मिळणार आहे. याचबरोबर विशाल डान्स ग्रुप वसई उमेळमान प्रस्तुत ‘महाराष्ट्र दर्शन’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे, तर शनिवारी (ता. २)‘शिवरायांचे संरक्षण व्यवस्थापन’ विषयावर सुनील कदम यांचे व्याख्यान, नंदेश उमप निर्मित लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत ‘मी मराठी’ सांस्कृतिक कार्यक्रम, तर रविवारी ३ मे रोजी इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत सोबत जंजिरे वसई किल्ला सफर, मोहिनी नृत्य कला केंद्र प्रस्तूत पदन्यास बॅले ग्रुप निर्मित, लोककल्याण राजा अर्थात शिवदर्शन कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
-----------------------------------
मशाल यात्रा मुख्य आकर्षण
नरवीर चिमाजी आप्पांनी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वसईच्या किल्ल्यावर विजय मिळविला होता. या शौर्याची आठवण म्हणून दरवर्षी वसई किल्ल्यात विजयोत्सव करण्यात येतो. यंदा बुद्धपौर्णिमा १ मे रोजी येत असल्याने वसई किल्ल्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात वज्रेश्वरीतून देवीचे दर्शनातून मशाल यात्रेतून होणार आहे. ही यात्रा किल्ल्यात आल्यानंतर बुद्धाच्या प्रतिमा तसेच किल्ल्यामधील चिमाजी आप्पांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com