

माता-बाल रुग्णालयाची प्रतीक्षा
मनुष्यबळाच्या अभावामुळे काम रखडले
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : कोपरखैरणे माता-बाल रुग्णालय येथील नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास वर्ष उलटले असले, तरी मनुष्यबळाच्या अभावामुळे रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे कोपरखैरणे परिसरातील नागरिकांची प्रतीक्षा अजूनही कायम असून, रुग्णालय नेमके कधी कार्यान्वित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधांसाठी वाशी, नेरूळ किंवा ऐरोली येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. विशेषतः गर्भवती महिला आणि लहान मुलांना उपचारासाठी चार ते आठ किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा ताण सहन करावा लागत होता.
महापालिकेने पर्यायी इमारत खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अनधिकृत बांधकामाच्या वादामुळे तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर जुन्याच ठिकाणी नवीन माता-बाल रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२२ पासून सुरू झालेले बांधकाम आता पूर्ण झाले असून, सुमारे १० कोटी रुपये खर्चून तळ व दोन मजली आधुनिक इमारत उभी करण्यात आली आहे. येथे प्राथमिक उपचार, आपत्कालीन सेवा तसेच माता व बालकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
स्थानिक नगरसेविका भारती पाटील यांनी महासभेत याबाबत प्रश्न उपस्थित करत रुग्णालय त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.
चौकट
विलंबाची कारणे
रुग्णालयाची इमारत पूर्ण असूनही आवश्यक डॉक्टर, परिचारिका व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता ही प्रमुख अडचण ठरत आहे. प्रशासकीय प्रक्रियेमुळे भरती प्रक्रिया लांबल्याने सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे.
चौकट
नागरिकांना दिलासा
रुग्णालय सुरू झाल्यानंतर कोपरखैरणे व घणसोली परिसरातील हजारो नागरिकांना जवळच उपचार मिळणार आहेत. त्यामुळे दूरच्या रुग्णालयांवर अवलंबित्व कमी होऊन वेळ व खर्चाची मोठी बचत होणार आहे.
कोट :
सध्या रुग्णालयाच्या इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी मनुष्यबळाच्या अभावामुळे ते पूर्ण क्षमतेने तत्काळ सुरू करणे शक्य होत नाही. आवश्यक कर्मचारी उपलब्ध होताच सेवा सुरू करण्यात येतील. येत्या पावसाळ्यापर्यंत रुग्णालय कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे.
- डॉ. राजेश म्हात्रे