

वज्रेश्वरी, ता. ४ (बातमीदार) : ठाणे व पालघर जिल्ह्याच्या भौगोलिक वातावरणात चांगले उत्पन्न देणारा सफेद कांदा यंदा लांबलेल्या आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसातही टिकून राहिला आहे. आता तो बाजारात दाखल झाला आहे. भिवंडी व वसई तालुक्यातील आठवडे बाजारात शेतकरी थेट आपला कांदा आणून विक्री करत असून ग्राहकांचा प्रतिसादही वाढला आहे. मात्र, यंदा हंगामाची सुरुवात उशिरा झाल्याने आणि कमी आवक असल्याने पहिल्याच टप्प्यात दोन किलोच्या माळेला १०० ते १५० रुपये असा चढा भाव मिळत आहे. काही ठिकाणी ८० ते १०० रुपयांपर्यंतही व्यवहार होत असल्याचे शेतकरी आणि विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे.
पारंपरिक पद्धतीने तयार होणारा हा सफेद कांदा शेतातून काढल्यानंतर स्वच्छ धुऊन काही दिवस सावलीत वाळवला जातो. त्यानंतर सुकलेल्या पातीच्या आधारे माळा तयार करून बाजारात विक्रीसाठी आणला जातो. पूर्वी मर्यादित प्रमाणात उत्पादन होणारा हा कांदा आता ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वाढत्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणात पिकवायला सुरुवात केला आहे. दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच रब्बी हंगामात सफेद कांद्याचे उत्पादन घेत आहेत. उत्पादनानंतर थेट आठवडे बाजारात विक्री करण्याचा कल वाढल्याने मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दोघांनाही तुलनेने परवडणारे दर मिळत आहेत.
थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांना फायदा
भिवंडी, वसई, अंबाडी, वज्रेश्वरी, दुगाडफाटा, अनगाव आणि मांडवी येथील आठवडे बाजारांमध्ये शेतकरी स्वतः माल घेऊन येत असल्याने थेट ग्राहकांपर्यंत माल पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत असल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मते, एका एकरातून सुमारे लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. खरिपानंतर रब्बी हंगामात या कांद्याचे उत्पादन वाढविण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
वाढती मागणी
सफेद कांदा चवीला तुलनेने गोडसर असून लाल कांद्याप्रमाणे उग्र नसतो. पावसाळ्यात शेतकरी कामादरम्यान सकाळच्या न्याहारीपासून दुपारच्या जेवणापर्यंत हा कांदा भाकरीसोबत आवडीने खातात. दोन ते अडीच किलोच्या एका माळेत साधारण ३० ते ३५ कांदे असतात, तर काही माळा तीन किलोपर्यंतही जातात. हंगामाच्या सुरुवातीला कमी आवक असल्याने दर जास्त राहतात, मात्र पुढील दोन ते चार आठवड्यांत बाजारात आवक वाढल्यावर दर घटण्याची शक्यता आहे.
साठवण, विक्रीबाबत सूचना
कांदा खरेदी केल्यानंतर त्याच्या माळा घरातील उंच ठिकाणी किंवा बांबूवर टांगून ठेवण्याची पद्धत वापरली जाते. त्यामुळे हवा खेळती राहते आणि कांदा जास्त काळ टिकतो. मात्र, योग्य प्रकारे सुकवलेला कांदाच खरेदी करावा, अन्यथा तो लवकर खराब होण्याची शक्यता असते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. हा कांदा प्रामुख्याने मार्च-एप्रिलमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण मिळतो. त्यानंतर येणारा कांदा तुलनेने साठवणीसाठी कमी टिकाऊ असल्याचेही शेतकरी व व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.