ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी काहीशी अवस्था शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील नागरिकांची झाली. अशातच दिवसेंदिवस तापमानात वाढ झालेली असून तीव्र उष्णतेमुळे धरणाच्या पाणीपातळीत घट होत आहे. तर, दुसरीकडे दोन्ही तालुक्यातील २७ गाव आणि १०३ पाड्यांतील ४२ हजार २७३ कुटुंबांना पाणीटंचाईच्या झळा सोसव्या लागत असून या गावपाड्यांना ३२ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये जल जीवन मिशन, नळ पाणीपुरवठा योजना, पूरक नळपाणी पुरवठा योजना, विंधन विहीर, कुपनलिका आदी योजना राबविण्यात येत आहे. तरी देखील पाणीटंचाई ग्रस्त गावपाड्यांच्या संख्येत घट होत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच ऑक्टोबर २०२५ ते जून या कालावधीत पाणी टंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने यंदाचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असून, पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणा सतर्क ठेवली आहे. टँकर पुरवठ्याचे नियोजन काटेकोरपणे राबविण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत.

तालुका गाव पाडे एकूण कुटुंबे टँकर
शहापूर २४ ९९ १२३ ४१,४८७ ३०
मुरबाड ३ ४ ७८६ २

Marathi News Esakal
www.esakal.com