बदलापूरच्या ‘त्या’ चिमुकलीच्या शिक्षणाची चिंता मिटली

बदलापूरच्या ‘त्या’ चिमुकलीच्या शिक्षणाची चिंता मिटली
Published on

सकाळ इम्पॅक्ट
----
बदलापूरच्या ‘त्या’ चिमुकलीच्या शिक्षणाची चिंता मिटली
शासकीय यंत्रणेला खडबडून जाग; मदतीसाठी पुढे सरसावले हात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचा दोन वर्षांपासून लालफितीत अडकलेला मोफत शिक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दैनिक ‘सकाळ’ने तिचे शैक्षणिक भवितव्य वाऱ्यावर असल्याचे वृत्त प्रसिद्ध करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली. परिणामी शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, विविध स्तरांतून मदतीचे हात पुढे येत असल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर पीडितेच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलणार, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार २०२४ मध्ये ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला; मात्र तब्बल दोन वर्षे उलटूनही निर्णय न झाल्याने या चिमुकलीचे शैक्षणिक भवितव्य अनिश्चिततेत सापडले होते. अशा परिस्थितीत मनसेचे संदीप पाचंगे मदतीला धावले आणि त्यांनी ३२ हजार रुपयांची थकलेली वार्षिक फी भरली. दुसरीकडे शासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वृत्त ‘सकाळ’ने ६ मे रोजी प्रसिद्ध केले आणि यानंतर प्रशासनाची झोप उडाली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्याशी संपर्क साधून प्रकरण मार्गी लावण्यास सांगितले. याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही पुढाकार घेत शिवसेना पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवली. त्याअनुषंगाने शिवसेना शहर प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी गणेश राणे यांनी मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. तिला इयत्ता पहिलीत प्रवेश मिळवून दिला. तसेच २२ हजार रुपयांची आगाऊ शालेय फी भरून दिली. शासनाची मदत मिळाली नाही तरी पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मराठा समाजाचाही पुढाकार
‘सकाळ’च्या वृत्तानंतर सकल मराठा हितवर्धक समाजानेही पुढाकार घेतला. नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या चिमुकलीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेण्यात आला.

मार्ग मोकळा; पण गोंधळ कायम
चिमुकलीच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असली तरी शासकीय स्तरावर अद्याप गोंधळ असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाने पालक आणि शाळेशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे; मात्र असा कोणताही संपर्क झालेला नसल्याचे पीडितेच्या वडिलांनी सांगितले.

फी परत करण्याचे आश्वासन
शाळेला फी आकारू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या तरीही फी घेतली असल्यास ती परत केली जाईल, अशी माहिती शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी दिली. तसेच नव्याने अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असून, त्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे सीईओ रणजित यादव यांनी स्पष्ट केले.

लढा सुरूच राहणार
बदलापूर प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडत ‘सकाळ’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. मनसेनेही आंदोलनाच्या माध्यमातून हा मुद्दा लावून धरला. दोन वर्षांनंतरही पिडीतेच्या शिक्षणाचा प्रश्न कायम असल्याचे समोर आणत संदीप पाचंगे यांनी हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला. ‘सकाळ’च्या पाठपुराव्यामुळे या लढ्याला धार मिळाली असून न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com