

कुर्ला भुयारी मार्गात वायुवीजनचा अभाव
उष्णतेमुळे प्रवासी हैराण; उपाययोजनांची गरज
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या कुर्ला रेल्वे स्थानकाच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी आवश्यक असलेले पंखे किंवा योग्य वायुवीजन व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना गुदमरल्यासारखे होत आहे. त्यामुळे हवा खेळती राहण्यासाठी वायुवीजन, अत्याधुनिक एक्झॉस्ट पंख्यासारखी आधुनिक सुविधा बसवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
हा भुयारी मार्ग ही रेल्वेची संपत्ती आहे. एक्झॉस्ट फॅन सुरू करण्यास आम्ही सूचना देणार आहे, अशी प्रतिक्रिया एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांनी दिली.
कुर्ला पूर्व-पश्चिम मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून हा पादचारी भुयारी मार्ग बांधला आहे. या भुयारी मार्गातून बीकेसी, बांद्रा, कलिना विद्यापीठ, धारावी, दादर, सांताक्रूझ, विलेपार्ले, वाशी, ठाणे, माहुल आदी ठिकाणी जाण्यासाठी बेस्ट बस पकडण्यासाठी दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात.
हा भुयारी मार्ग बांधल्यानंतर पहिल्याच पावसात येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच छतामधून पाणी गळती होत होती. सध्या वाढलेल्या उष्णतेमुळे या मार्गातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. बंदिस्त वातावरण, प्रचंड गर्दी आणि वायुवीजनचा अभाव यामुळे आतले तापमान असह्य पातळीवर पोहोचत आहे. भुयारी मार्गात काही मिनिटे उभे राहिले तरी श्वास घेणे कठीण होते. घामाने अंग ओलेचिंब होते आणि चक्कर येते, अशा प्रतिक्रिया काही प्रवाशांच्या आहेत. तर उष्णतेमुळे अस्वस्थ होत असल्याची तक्रार काही नागरिकांच्या आहेत;
मात्र रेल्वे प्रशासनाने हा पादचारी भुयारी मार्ग देखभालीसाठी पालिकेच्या ताब्यात दिला असतानाही पालिका एल विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. कुर्ला पालिका एल विभाग तसेच रेल्वे प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे, अन्यथा वाढत्या उष्णतेमध्ये एखादी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
दररोज कामावर जाण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर करतो; मात्र आत इतकी उकाड्याची परिस्थिती असते की काही वेळ थांबणेही कठीण होते. तातडीने पंखे आणि वायुवीजनाची व्यवस्था करावी.
- सलीम तांबोळी, प्रवासी
पावसाळ्यात पाणी साचते आणि उन्हाळ्यात उष्णतेमुळे गुदमरल्यासारखे होते. त्याचा त्रास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सर्वाधिक होतो.
- मोहम्मद नसीम शेख, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.