राष्ट्रीय महामार्ग ६१ वर गतिरोधक बसवावेत

राष्ट्रीय महामार्ग ६१ वर गतिरोधक बसवावेत
Published on

टोकावडे, ता. ७ (बातमीदार) : कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग ६१ हा सिमेंट काँक्रीट रस्ता तयार झाल्यापासून वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यातून अपघातांचे प्रमाणही चिंताजनकरीत्या वाढले आहे. मंगळवारी (ता. ५) वैशाखरेजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, अपघाताची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी तत्काळ गतिरोधक बसवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत वैशाखरे ते सावर्णे यादरम्यान येणाऱ्या सर्व गावांच्या हद्दीत त्वरित गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. या मार्गावरील वैशाखरे, मोहवाडी, झाडघर, शिसेवाडी, डोंगरवाडी, भोईरवाडी, भोरांडे, आवळेवाडी, न्याहाडी, मोरोशी, मोरोशी आश्रमशाळा, फांगूळगव्हाण, साखरवाडी, निरगुडपाडा आणि चिंचवाडी या गावांजवळ वाहने प्रचंड वेगाने धावत असतात. तसेच या महामार्गाजवळ अनेक आदिवासी बांधव रानमेवा विक्रीसाठी बसत असतात; परिणामी स्थानिक नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे बोलले जाते.

‘रस्ता रुंद, वळणे आणि गुळगुळीत झाल्यामुळे वाहनचालक वेगावर नियंत्रण ठेवत नाहीत. त्यामुळे अपघाताची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रत्येक गावाजवळ गतिरोधक बसविणे अत्यावश्यक आहे,’ असे रघुनाथ खाकर यांनी स्पष्ट केले. तसेच, पुढील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com