सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध

सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध
Published on

सामूहिक विवाहसोहळ्यात सहा जोडपी विवाहबद्ध
गीता ट्रस्टच्या उपक्रमातून कमी खर्चात संस्मरणीय विवाहसोहळा
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) ः भांडुप परिसरात आयोजित केलेल्या सामूहिक विवाहसोहळ्याने सामाजिक बांधिलकी, परंपरा आणि साधेपणाचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. गीता ट्रस्टच्या पुढाकारातून रविवारी (ता. १०) भांडुप येथील दिना पाटील इस्टेट येथे पार पडलेल्या या उपक्रमात सहा जोडप्यांनी नव्या आयुष्याची आनंददायी सुरुवात केली.
प्रखर उन्हाच्या वातावरणातही मंगलाष्टकांचे मधुर सूर, ढोल-ताशांचा गजर आणि आकर्षक फुलसजावटीमुळे संपूर्ण परिसर मंगलमय वातावरणाने भारावून गेला होता. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात सामूहिक विवाहसोहळे क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे या कार्यक्रमाने स्थानिक नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या वधू-वरांचे आगमन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. कार्यक्रमाला उपस्थित नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी आयुष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.
या वेळी त्यांनी सामूहिक विवाह ही काळाची गरज असल्याचे मत मांडले. विवाह समारंभात होणारा अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने आणि सामाजिक जाणीव ठेवून विवाह करण्याला अधिक प्राधान्य द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबांनाही सन्मानाने विवाह सोहळा पार पाडण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले. गीता ट्रस्टच्या या उपक्रमामुळे सहा कुटुंबांना कमी खर्चात, आनंदी आणि संस्मरणीय वातावरणात विवाहसोहळा साजरा करता आला.

Marathi News Esakal
www.esakal.com