२८ हजार वीज प्रकरणांचा निपटारा

२८ हजार वीज प्रकरणांचा निपटारा
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : राष्ट्रीय लोकअदालतीत कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित; तसेच वीजचोरीशी संबंधित तब्बल २८ हजार ४८८ दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीद्वारे निपटारा करण्यात आला. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या ग्राहकांनी महावितरणच्या सवलतींचा लाभ घेत एकूण नऊ कोटी ८४ लाख रुपयांचा भरणा केला.
महावितरणकडून कल्याण परिमंडलातील वीज थकबाकीदार आणि वीजचोरीशी संबंधित ग्राहकांची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यासाठी एकूण दोन लाख ८१ हजार ४४४ ग्राहकांना नोटिसा पाठवल्या होत्या. त्यापैकी २८ हजार ४८८ ग्राहकांनी लोकअदालतीत सहभाग घेत आपली प्रकरणे निकाली काढली. महावितरण आणि ग्राहकांमध्ये झालेल्या सामोपचारातून मोठ्या प्रमाणावर वसुली झाली. ठाणे आणि पालघर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने तसेच कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आणि महावितरणच्या विधी विभागाने विशेष प्रयत्न केल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
कल्याण मंडळ-१ अंतर्गत काही प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एक लाख ७५ हजार रुपयांची वसुली झाली. तर कल्याण मंडळ-२ मध्ये १३ हजार ६४५ प्रकरणांचा निपटारा करत तब्बल आठ कोटी २६ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. वसई मंडळात १४ हजार ७०२ प्रकरणांतून १ कोटी ४७ लाख रुपयांची वसुली झाली. तसेच पालघर मंडळ कार्यालयांतर्गत १४१ ग्राहकांनी ९ लाख ९७ हजार रुपयांचा भरणा करत आपली प्रकरणे सामंजस्याने निकाली काढली.

थकबाकीदारांची आकडेवारी
दरम्यान, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वीज थकबाकीची गंभीर आकडेवारीही समोर आली आहे. कल्याण मंडळ-२ अंतर्गत एक लाख ६१ हजार ४३९ ग्राहकांकडे तब्बल १३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वसई मंडळ अंतर्गत एक लाख एक हजार ९१ ग्राहकांकडे ११२ कोटी रुपये, तर पालघर मंडळ कार्यालयांतर्गत १८ हजार ५८६ ग्राहकांकडे १९ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. या तीन मंडळांतील एकूण थकबाकी २६६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com