

धावत्या चारचाकीने घेतला पेट
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : उलवेकडून नेरूळच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी गाडीला बुधवारी (ता. १३) भीषण आग लागल्याची घटना घडली. उरण मार्गावरील आयुक्त बंगल्यासमोर हा प्रकार घडला. यादरम्यान, चालक वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला असून, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
नेरूळ सेक्टर १९ येथील शशिधर पांडे हे बुधवारी दुपारी गाडीने उरण फाट्याच्या दिशेने जात होते. त्यांची गाडी पोलिस आयुक्त बंगल्यासमोर आली असता, इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून पांडे यांनी गाडी तातडीने रस्त्याच्या बाजूला उभी केली आणि ते खाली उतरले आणि काही क्षणांतच गाडीने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच नेरूळ आणि सीबीडी बेलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले.
भरदुपारी मुख्य मार्गावर लागलेल्या या आगीमुळे उरण फाट्याकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत अडकलेली वाहने दुसऱ्या मार्गाने वळवून कोंडी फोडली.