

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पूर्व उपनगरातील नालेसफाईच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर आले. राडारोडा टाकला होता. प्लॅस्टिक बाॅटल्यांचा खच, ट्रश बूमचे कंत्राट मार्चमध्ये संपले, गोवंडी येथील नाल्यांवर झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण झाले आहे, असा दावा सभागृह नेते गणेश खणकर यांनी मंगळवारी (ता. १२) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. १० वर्षांपूर्वी नाल्याशेजारी काय स्थिती होती आणि आता काय स्थिती आहे, यासाठी उपग्रहाने फोटो काढा. सर्व सत्य समोर येईल, असे खणकर यांनी स्पष्ट केले.
नालेसफाईच्या कामाला उशिरा सुरुवात झाली. मिठी नदीतील गाळ उपसा होत नाही. गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांच्या तीन हजार ६०४ फेऱ्या झाल्या आहेत, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. याचा अर्थ १० दिवसांत एक हजार ८०० फेऱ्या म्हणजेच एका दिवसात १८० फेऱ्या हे कसे शक्य आहे. याची तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत का? मिठी नदीच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला, असा दावा काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी स्थायी समितीत केला. पावसाळ्यात डॉ. अमरापूरकर यांच्याबाबतीत दुर्दैवी घटना घडली तशी घडू नये, याकडे खणकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले.
प्रभागामध्ये नालेसफाईच्या कामासाठी मनुष्यबळ नाही, सभागृह नेते कुठे पाहणी करतात माहीत नाही; पण नालेसफाई किती झाली, याची पाहणी करण्यासाठी आम्हाला बरोबर घेऊन जा, असा टोला आझमी यांनी सत्ताधारी पक्षाला लगावला.
२०११ पर्यंतच्या झोपड्यांना सरकारचे संरक्षण
नालेसफाईच्या मुद्द्यावर पाऊण तास चर्चा झाली. घाटकोपर येथे मंगळवारी पाहणी केली, त्या ठिकाणी खाडीजवळ अतिक्रमण झाले. २०११ पर्यंतच्या झोपड्यांना आमच्याच सरकारने संरक्षण दिले; मात्र आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिणार असून, नाले अतिक्रमणमुक्त करा, अशी मागणी करणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.