

पाणीटंचाईची खिशाला झळ
टँकरअभावी बाटलीबंद पाण्यावर भिस्त, दुप्पट दराने विक्री
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ ः कल्याण-डोंबिवलीत २० टक्के पाणीकपात लागू आहे. अशातच पाण्याच्या टँकरसाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागते. तर दुसरीकडे बाटलीबंद पाण्यासाठी वाढीव पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या खिशाला पाणीटंचाईची झळ बसत आहे.
महापालिका प्रशासनाने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी विभागनिहाय कपात केल्याने नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील शेकडो सोसायट्या, रहिवासी संकुलांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे; मात्र मागणीच्या तुलनेत टँकरची संख्या अत्यल्प असल्याने रहिवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार दररोज सुमारे ३१० ठिकाणी टँकरची मागणी होत आहे; पण केवळ २५ टँकर उपलब्ध असून दिवसभरात ८० फेऱ्या होत असल्याने प्रशासनाचीदेखील दमछाक होत आहे.
-------------------------
पैसे भरूनही प्रतीक्षा
पाणीटंचाईमुळे सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थांना बसत आहे. टँकरसाठी पालिकेकडे पैसे भरूनही वेळेत पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. काही सोसायट्यांना टँकरसाठी दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळित झाले आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता तसेच इतर मूलभूत गरजांसाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
--------------------------
यंत्रणा कोलमडण्याच्या उंबरठ्यावर
अचानक वाढलेल्या मागणीमुळे उपलब्ध यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दोन शिफ्टमध्ये टँकर धावत असले तरी मागणी पूर्ण होत नाही. अनेक नागरिक अतिरिक्त साठा करण्यासाठी टँकर मागवत असल्याने परिस्थिती अधिक बिकट होत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास आपत्कालीन परिस्थिती वगळता टँकर पुरवठ्यावरही निर्बंध आणण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
------------------------------
काळाबाजाराला खतपाणी
नळाचे पाणी, टँकर अनिश्चित झाल्याने बाटलीबंद पाण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. याच परिस्थितीचा फायदा काही विक्रेत्यांनी ४० रुपयांचा २० लिटरचा जार थेट ८० रुपये केला आहे. नागरिकांच्या अडचणीवर नफा कमावण्याचा हा प्रकार संतापजनक असल्याची प्रतिक्रिया विविध भागांतून उमटत आहे. विशेष म्हणजे, वाढीव दराबाबत विचारणा केल्यास काही विक्रेत्यांकडून उद्धट वर्तन केले जात असल्याच्या तक्रारी आहेत.
------------------------------
पाण्याच्या गुणवत्तेवरही संशय
बाटलीबंद पाण्याचा वाढता वापर चिंतेचा विषय ठरत आहे. शहरभर विविध ठिकाणांहून पाण्याचे जार पुरवले जात असले तरी हे पाणी नेमके कुठून भरले जाते, त्याची शुद्धता तपासली जाते का, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
-------------------------
उपलब्ध पाणीसाठा
बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघ्या २२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पालिकेला तातडीने २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागला; मात्र मॉन्सूनचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढला नाहीतर येत्या काही आठवड्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे.
--------------------
प्रशासनाचा हस्तक्षेप गरजेचा
नियमित पाणीपुरवठ्यातील कपात, टँकरसाठीची प्रतीक्षा, बाटलीबंद पाण्यावरील वाढता खर्च, अशा तीन आघाड्यांवर कल्याण-डोंबिवलीकर संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत टँकर व्यवस्थापन अधिक सक्षम करणे, पाणी विक्रेत्यांवर नियंत्रण आणणे, दर निश्चित करणे तसेच पाण्याच्या गुणवत्तेची कठोर तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
---------------------------
येथे सर्वाधिक फटका
डोंबिवली पूर्व-पश्चिम, कल्याण पूर्व-पश्चिम, ‘अ’ प्रभाग, २७ गावांमध्ये टँकरसाठी स्पर्धा लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.