

मुंबईत क्षयरोगाची चिंता कायम
तीन वर्षांत १.३३ लाखांहून अधिक रुग्ण
भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः मुंबईत गेल्या तीन वर्षांत क्षयरोगाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. मुंबईतील विविध क्षय केंद्रांमध्ये फुप्फुसातील (पल्मोनरी) आणि फुप्फुसाबाहेरील (एक्स्ट्रा पल्मोनरी) एकूण तब्बल एक लाख ३३ हजार ४१० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महानगरातील क्षयाचे आव्हान कायम असल्याचे चित्र आहे.
मुंबईत आरोग्य विभागाकडून क्षयरोग निर्मूलनासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तरीही शहरी भागात रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबईतील दाट लोकवस्ती, स्थलांतरित लोकसंख्या, कुपोषण, मधुमेह आणि प्रदूषण यासारख्या कारणांमुळे क्षयाचे आव्हान कायम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. २०२५ मधील आकडेवारीनुसार मालाड, दादर, अंधेरी पश्चिम, गोवंडी आणि अंधेरी पूर्व या भागांमध्ये फुप्फुसातील क्षयाचे रुग्ण अधिक आढळले आहेत. तर मालाड, अंधेरी पश्चिम, कांदिवली, घाटकोपर आणि दादर या भागांत फुप्फुसाबाहेरील क्षयाचे प्रमाण लक्षणीय आहे.
----
मुंबईतील तीन वर्षांतील रुग्णसंख्या
वर्ष फुप्फुसातील फुप्फुसाबाहेरील
२०२३ २९,९६२ १८,३१८
२०२४ २६,६४९ २०,१३५
२०२५ २१,१८१ १७,१६५
---
सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
मालाड ९,८३३
दादर ९,०१७
अंधेरी ८,०८७
गोवंडी ७,२७३
घाटकोपर ७,०९६
----
विविध उपाययोजनांवर भर
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांअंतर्गत बाधित रुग्णांना डॉट्स प्रणालीद्वारे क्षयरोगाची मोफत औषधे, निःक्षय पोषण योजना, निःक्षय मित्र यांसारखे कार्यक्रम राबवले जातात. आता राज्य शासनाने आशा सेविकांचेही स्वतंत्र प्रशिक्षण सुरू केले आहे. सुमारे ८६ हजार आशा सेविकांना जनजागृती, समुपदेशन, चाचणी केंद्रापर्यंत पोहोचवणे, समाजमाध्यमांतून जनजागृतीसाठी त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
---
राज्यातही प्रभाव कायम
राज्यात गेल्या तीन वर्षांत क्षयरोगाचे तब्बल सहा लाख १२ हजार ३१७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये तीन लाख ७७ हजार ५२५ फुप्फुसातील क्षयाचे तर दोन लाख ३४ हजार ७९२ फुप्फुसाबाहेरील क्षयाचे रुग्ण आहेत. राज्यात दरवर्षी सरासरी दोन लाखांहून क्षयरुग्ण आढळत असल्याने क्षयमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
----
लक्षणे कोणती?
दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला, वजन घटणे, ताप, रात्री घाम येणे किंवा सतत थकवा जाणवत असल्यास त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि पूर्ण औषधोपचार केल्यास टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो.
----
मुंबईत दरवर्षी सरासरी ५० हजार एकूण क्षयाचे रुग्ण आढळतात. क्षय हा दुर्धर आजार असल्याने जागरुकता वाढवणे आवश्यक आहे.
- डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका