

मुसळधार पावसानंतर वलगणीच्या मासेमारीला बहर
बाजारात चविष्ट माशांची रेलचेल, खवय्यांमध्ये उत्साह
उलवे, ता, २४ (बातमीदार) ः मॉन्सूनच्या पहिल्या दमदार सरी कोसळल्या की खाड्या, नद्या, ओढे आणि शेतशिवारांमध्ये एक वेगळीच लगबग सुरू होते. ही लगबग असते ती वलगणीच्या अर्थात चढणीच्या माशांची. वर्षभर वाट पाहिल्यानंतर अवघ्या काही दिवसांसाठी उपलब्ध होणारे हे मासे बाजारात दाखल होताच खवय्यांमध्ये कमालीच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसामुळे नदी-नाले आणि खाड्यांमधील पाण्याची पातळी वाढते. याच काळात विविध प्रकारचे मासे अंडी घालण्यासाठी पाण्याच्या प्रवाहासोबत शेतांमध्ये, पाणथळ भागांमध्ये आणि ओढ्यांच्या दिशेने प्रवास करतात. या स्थलांतराला स्थानिक भाषेत चढण, उधवन किंवा वलगण असे म्हणतात.
सध्या बाजारात चिवणी, खुबे, कालवे, मुठे, शिवडा, मळे, अरळी, वाम, कोळंबी, शिंगटी यांसारख्या माशांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. सकाळपासूनच मासळी बाजारांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत असून, अनेक ठिकाणी हे मासे काही तासांतच विकले जातात आणि अनेकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते.
गाबोळीचे मुख्य आकर्षण
या माशांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश मासे अंडीधारक असतात. स्थानिक बोलीभाषेत या अंड्यांना गाबोळी किंवा पेर असे संबोधले जाते. गाबोळीची चव ही वलगणीच्या माशांची खरी ओळख मानली जाते. तळलेली गाबोळी, मसालेदार कालवण किंवा पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ यांचा आस्वाद घेण्यासाठी खाद्यप्रेमी उत्सुक असतात.
आर्थिक हातभार
या हंगामामुळे केवळ खवय्यांनाच आनंद मिळत नाही, तर आगरी, कोळी, आदिवासी आणि गळभोई समाजातील अनेक कुटुंबाच्या उत्पन्नालाही हातभार लागतो. पहाटेपासून पाणथळ भागात जाळे, पाग आणि इतर पारंपरिक साधनांच्या मदतीने मासेमारी सुरू असते. काही ठिकाणी तर संपूर्ण कुटुंब या कामात सहभागी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात वलगणीच्या माशांना सर्वाधिक मागणी असते.