

महापालिकेच्या गाळ्यांवर
२२ वर्षांपासून कब्जा?
६.५३ कोटींच्या भाडे नुकसानीचा दावा; उच्च न्यायालयात याचिका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : पोखरण रोड क्रमांक दोन, वसंत विहार येथील आनंद्राम लघुउद्योग संकुलातील ठाणे महापालिकेच्या नऊ गाळ्यांवर गेल्या २२ वर्षांपासून अनधिकृत ताबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या गाळ्यांमुळे महापालिकेचे तब्बल सहा कोटी ५३ लाख ७० हजार रुपयांच्या भाड्याचे नुकसान झाले असून, हे गाळे ताब्यात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
योगेश शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. २७ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने २६ सप्टेंबर २०२५ रोजी अहवाल दिला. पुढे ६ जानेवारी, २५ जानेवारी आणि २ मार्च २०२६ रोजीही या प्रकरणाबाबत तक्रारी करण्यात आल्या. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अहवालात याप्रकरणी चौकशी अथवा कारवाई प्रस्तावित असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. याचिकाकर्त्याने न्यायालयाकडे महापालिकेच्या अहवालावर तातडीने कार्यवाही करीत, संबंधित नऊ गाळ्यांमधील अनधिकृत ताबेदारांना हटवून गाळे महापालिकेच्या ताब्यात घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचा इतक्या दीर्घकाळ वापर होत असताना त्यांच्याकडून भाडे वसूल झाले का, तसेच कारवाई का झाली नाही, याची चौकशी करण्याची तसेच, संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या वैयक्तिक खिशातून महापालिकेचे नुकसान वसूल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्ती आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर ८ सप्टेंबर २०२६ रोजी या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अहवालात काय?
आनंद्राम लघुउद्योग संकुलातील काही गाळ्यांच्या वाटप प्रक्रियेत अनियमितता आढळल्याचे अहवालात नमूद आहे. पुनर्वसनाच्या आराखड्यात गाळे आणि शौचालयांची तरतूद असताना प्रत्यक्ष ठिकाणी अतिरिक्त गाळ्यांचा वापर सुरू असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तक्रारीत नमूद नऊ गाळेधारकांचे पुनर्वसन महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत झालेले नसल्याचे स्थावर मालमत्ता विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
नऊ गाळ्यांच्या नुकसानीचा हिशेब
याचिकेसोबत जोडलेल्या नऊ गाळ्यांच्या तक्त्यानुसार काही गाळ्यांचा ताबा २००२ आणि २००६पासून, तर काहींचा २०२०पासून असल्याचे नमूद आहे. दरमहा ३० हजार रुपये या अंदाजे भाड्याच्या आधारे या नऊ गाळ्यांपोटी सुमारे सहा कोटी ५३ लाख ७० हजार रुपयांचे भाडे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.